वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ, दुसऱ्या वर्षी एक कोटी रुपयांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST2021-07-22T04:14:23+5:302021-07-22T04:14:23+5:30
शिवाजी पवार श्रीरामपूर : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूरची आषाढी पायी वारी झाली नाही. याचा फटका वारकऱ्यांसह एसटी महामंडळालाही ...

वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ, दुसऱ्या वर्षी एक कोटी रुपयांना फटका
शिवाजी पवार
श्रीरामपूर : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूरची आषाढी पायी वारी झाली नाही. याचा फटका वारकऱ्यांसह एसटी महामंडळालाही बसला आहे. राज्य सरकारने राज्यातून जाणाऱ्या केवळ ७ मानकरी पालख्यांसह इतर ४ पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी दिली होती. नगर जिल्ह्यातील महामंडळांच्या आगारांना त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
नगर जिल्ह्यातून दरवर्षी लाखो भाविक पंढरपूर येथे आषाढी एकादशीला जातात. पायी वारीसह एसटीने प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांची संख्याही मोठी असते. आषाढीनिमित्त बसेसच्या फेऱ्या अधिक होतात. मात्र त्यानंतरही पंधरा दिवस बसेस पूर्ण क्षमतेने धावतात. जिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, नेवासेसह सर्वच आगारांच्या उत्पन्नात त्यातून वाढ होते. मात्र कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी महामंडळाला या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.
-------
बसेस दरवर्षी पंढरपूरला सोडल्या जायच्या : ३००
----------
रुपये उत्पन्न मिळायचे एसटीला : एक कोटी रुपये
-------
प्रवासी एसटीतून प्रवास करायचे : दोन ते अडीच लाख
------------
यंदा एसटीने गेली एकच पालखी
पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील एकमेव पालखी यंदा एसटीने पंढरपूरला रवाना झाली होती. अन्य पालख्यांना मात्र कोरोनामुळे संधी मिळू शकली नाही.
--------------
जिल्ह्यातून दरवर्षी जाणाऱ्या पालख्या
जिल्ह्यातून दरवर्षी १० ते १२ मानाच्या पालख्या आषाढी वारीला जातात. त्याशिवाय इतर ७० ते ८० पालख्याही प्रस्थान करतात. प्रमुख पालख्यांमध्ये संत महिपती महाराज, संत निळोबाराय, देवगड, नेवासे येथील संत ज्ञानेश्वर, जंगली महाराज यांचा समावेश आहे.
----------
दरवर्षी पंढरपूरला आषाढी वारीला २०० ते २५० फेऱ्या होतात. ही संख्या ३०० चा टप्पाही ओलांडत. साधारणपणे १० ते १२ दिवस पूर्ण क्षमतेने बसेस धावतात. महिनाभर महामंडळाला भरघोस उत्पन्न मिळायचे.
- विजय गिते,
विभागीय नियंत्रक,
नगर.
----------
सरकारने सर्व उद्योग, व्यवसाय खुले ठेवले. मात्र वारकऱ्यांवर गदा आणली. खरेतर लशींचे डोस घेतलेल्या व नियम पाळणाऱ्या दिंडीला जाण्यास परवानगी द्यायला हवी होती. वारकऱ्यांना तसा निर्णय भावला असता.
-बबनराव मुठे, वारकरी, मुठेवाडगाव, श्रीरामपूर.
---------