एकशे पंधरा तलाव पारनेरमध्ये कोरडे
By Admin | Updated: May 26, 2014 00:26 IST2014-05-26T00:13:47+5:302014-05-26T00:26:31+5:30
पारनेर : तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी टंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवत आहेत.

एकशे पंधरा तलाव पारनेरमध्ये कोरडे
पारनेर : तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी टंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवत आहेत. अनेक गावांमधील पिण्याच्या पाण्याचे उद्भव कोरडे पडल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्याला वरदान ठरणारे मांड ओहोळ धरण व हंगा तलावातील पाणीसाठा अत्यल्प झाला असून त्याचा परिणाम टाकळीढोकेश्वरसह परिसरातील गावे व पारनेर शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. तालुक्यातील सुमारे एकशे पंधरा तलाव कोरडे पडल्याने पाण्याची टंंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे. पाणी योजनांवर परिणााम मागील तीन वर्षे दुष्काळाच्या खाईत लोटलेल्या पारनेरकरांना यंदा काही प्रमाणात चांगला पाऊस झाल्याने मे महिन्याच्या सुरवातीपर्यत दुष्काळाच्या झळा कमी प्रमाणात जाणवत होत्या. मात्र आता उष्णतेचे प्रमाण वाढल्याने तालुक्यातील उत्तर भागाला वरदान ठरणार्या मांडओहोळ प्रकल्पातही पाणीसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे टाकळीढोकेश्वर व परिसरातील पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे. कान्हूरपठारसह पंधरा गावांची पाणी योजना बंदच कान्हूरपठारसह पिंपळगाव रोठा ते पुणेवाडीपर्यंतच्या गावांना किमान दुष्काळात लाभदायक ठरणारी पंधरा गावांची प्रादेशिक नळ योजना वीजबिल भरणा व इतर कारणांमुळे सध्या बंद असल्याने कान्हूरपठार, पुणेवाडी, वेसदरे परिसरातील गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. यामुळे योजनेचा लाखो रूपये खर्च वाया जाणार आहे. पिण्याच्या पाण्याबरोबर चार्याचा प्रश्नही सध्या गंभीर बनला आहे. त्यामुळे जनावरे कशी सांभाळावी, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला. (तालुका प्रतिनिधी)
अनेक ठिकाणी पाण्याचे उद्भव कोरडे पडले असल्याने कांद्याला त्याचा फटका बसत आहे. पारनेर बाजार समितीमध्ये रविवारी सोळा हजार कांदा गोण्यांची आवक झाल्याची माहिती सभापती काशिनाथ दाते, उपसभापती अरूण ठाणगे यांनी दिली. कांद्याला काही ठिकाणी पाणी मिळत नसल्याने शेतकरी उशीरा कांदा घेऊन येत आहेत. चांगल्या कांद्याला क्विंटलमागे एक हजार चारशे ते चारशे पन्नास रूपये भाव मिळाल्याचे सचिव सुभाष कावरे यांनी सांगितले. पंधरा गावे, वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणी तालुक्यातील वडगाव आमली, वडगाव सावताळ, पुणेवाडी, कान्हूरपठार, वेसदरे, पळवे बुदु्रुक, भांडगाव,सिध्देश्वरवाडी, काकणेवाडी, दैठणे गुंजाळ या गावांसह पारनेर, वासुंदे, हंगा येथील वाड्या, वस्त्यांना सध्या टँकरने पाणीपुरवठा चालू असल्याची माहिती तहसीलदार डॉ.विनोद भामरे यांनी दिली. बाभूळवाडे येथील ठाकरवाडी व परिसरातील गावांसाठी टँकर सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे दुष्काळाचे सावट असतानाच रविवारी पिंपळगाव जोगा धरणातून पारनेर तालुक्यातील अळकुटी व परिसरातील गावासाठी पिंपळगाव जोगा धरणातून पाण्याचे शेवटचे आवर्तन सोडण्यात आल्याची माहिती पिंंपळगाव जोगा कृती समितीचे अध्यक्ष, पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ.भास्कर शिरोळे यांनी दिली. रविवारी सुटणारे हे आवर्तन धरणात आवश्यक पाणीसाठा असेपर्यंत चालू राहणार असून देवीभोयरे फाट्याजवळील साठवण तलाव व लोणीमावळा येथील तलाव भरून घेण्याच्या सूचना डॉ. शिरोळे यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. या आवर्तनाचा अळकुटी, लोणीमावळासह आठ ते दहा गावांना तसेच भुईमुग, कांदा, घास या पिकांना फायदा होणार आहे.