निघोजची दारूबंदी पडताळणी प्रक्रियेतच नापास
By Admin | Updated: June 12, 2016 22:43 IST2016-06-12T22:36:40+5:302016-06-12T22:43:05+5:30
पारनेर: दारुबंदीसाठी महिलांनी केलेल्या मागणीसाठी रविवारी झालेल्या पडताळणीत एक हजार महिलांचा जादुई आकडा गाठण्यात अपयश आल्याने निघोजमध्ये दारुची बाटली उभीच राहणार असल्याची माहिती आहे.

निघोजची दारूबंदी पडताळणी प्रक्रियेतच नापास
पारनेर: दारुबंदीसाठी महिलांनी केलेल्या मागणीसाठी रविवारी झालेल्या पडताळणीत एक हजार महिलांचा जादुई आकडा गाठण्यात अपयश आल्याने निघोजमध्ये दारुची बाटली उभीच राहणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षिका भाग्यश्री जाधव यांनी निकाल राखीव ठेवला असून, जिल्हाधिकाऱ्यांसमोरच सर्व पडताळणीची कागदपत्रे उघड करण्यात येणार आहेत़ त्यानंतर जिल्हाधिकारीच निकाल जाहीर करतील, असेही त्यांनी सांगितले.
पारनेर तालुक्यातील निघोज येथे दारुबंदीसाठी बबन कवाद, अमृता रसाळ, प्रशांत वराळ, डॉ. महेंद्र झावरे, दत्ता भुकन, कांता लंके, सुरेखा लामखडे, पुष्पा वराळ यांच्यासह अनेक महिलांनी दारुबंदीचा ठराव केला होता. त्यानंतर मतदानात गोंधळ झाल्याने प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाने पुन्हा प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवारी निघोज येथील कुंड रस्त्यावरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पडताळणी सुरू केली. दारू दुकानदार व दारुबंदी चळवळीचे कार्यकर्ते दोन्ही ठिकाणी ठाण मांडून होते. दुपारी दोनपर्यंत फक्त आठशे महिलांचीच पडताळणी झाली होती. दुपारनंतर पुन्हा वेग वाढल्याने दारुबंदी चळवळीच्या कार्यकर्त्यांना थोडासा दिलासा मिळाला होता. महिलांच्या पूर्ण पडताळणीचा जादुई आकडा पार करण्यासाठी किमान एक हजार महिलांची पडताळणी होणे आवश्यक होेते. मात्र, त्यातही काही कमी पडल्याची माहिती आहे.
(तालुका प्रतिनिधी)
राज्य उत्पादन शुल्क विभागाला पूर्वी झालेल्या गोंधळाला जबाबदार धरण्यात येत होते. त्यामुळे जिल्हा अधीक्षिका भाग्यश्री जाधव यांनी पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांच्या सहकार्याने पडताळणी सुरळीत होण्यासाठी पद्धतशीर नियोजन केले. पडताळणीत नाव असलेल्या महिलांनाच आत सोडण्यात येत होते़ त्यामुळे कोणताही गोंधळ झाला नाही. सकाळी नऊ वाजता पडताळणी सुरू झाल्यानंतर दुपारी दोनपर्यंत पडताळणी पूर्ण होत नाही, असे समजल्यावर पुन्हा पाच वाजेपर्यंत पडताळणीची मुदत वाढवून देण्यात आली.
यावेळी जाधव यांनी गावात स्वत: फेरी मारून महिलांनी दारुबंदीच्या पडताळणीसाठी यावे, असे आवाहनही केले. आपण सर्व नियमात प्रक्रिया केली असल्याचे जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.