कुकडी आवर्तनाचा निर्णय होणार पुढील आठवड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 12:11 IST2019-02-06T12:10:46+5:302019-02-06T12:11:44+5:30
पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी कालवा सल्लागार समितीची काल मुंबईत बैठक झाली. पण या बैठकीत पुणे आणि नगर जिल्हाधिकारी यांनी पिण्याच्या पाण्यासाठी अवास्तव मागणी केल्यामुळे आवर्तनाचा निर्णय पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

कुकडी आवर्तनाचा निर्णय होणार पुढील आठवड्यात
श्रीगोंदा : पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी कालवा सल्लागार समितीची काल मुंबईत बैठक झाली. पण या बैठकीत पुणे आणि नगर जिल्हाधिकारी यांनी पिण्याच्या पाण्यासाठी अवास्तव मागणी केल्यामुळे आवर्तनाचा निर्णय पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी नेमके किती पाणी लागेल याचा वास्तव आढावा घेऊन मागणी करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आली. बैठकीत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार दिलीप वळसे, आमदार राहुल जगताप, आमदार बाबुराव पाचर्णे, आमदार शरद सोनवणे, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, घोड गंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार, कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे उपस्थित होते
गेल्या आवर्तनात पिण्यासाठी किती पाणी दिले गेले, त्यामधील किती पाणी शिल्लक आहे. कोणत्या तलावावर पिण्याचे टँकर भरण्याची व्यवस्था आहे. कोणत्या तलावावर ग्रामपंचायतीची थेट पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. यावर बैठकीत चर्चा झाली. चार दिवसात पुणे व नगर येथे गिरीश बापट व राम शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत पिण्याच्या पाण्याचा आढावा घेऊन पाण्याच्या पाण्याची मागणी करण्यात येणार आहे.
पिण्याच्या पाण्यावर शेतीचे आवर्तन
पिण्याच्या पाण्यासाठी नगर व पुणे जिल्हाधिकारी किती मागणी करतात. त्यानंतर धरणांमध्ये किती पाणी शिल्लक राहते. यावर शेतीचे आवर्तन अवलंबून राहणार आहे.
कुकडी आवर्तनावर प्रश्नचिन्ह
कुकडी प्रकल्पात 29% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. अशा परिस्थितीत कुकडीचे आवर्तन पिण्यासाठी कि शेतीसाठी सोडायचे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत फळबागांना १ मार्च दरम्यान फळबागांना पाणी देता येऊ शकते. पण त्यासाठी डिंभे, माणिकडोह व पिंपळगाव जोगे धरणातील पाण्याचा येडगाव धरणात एकत्रीत मेळ घालून निर्णय घेतला तर आवर्तन देता येऊ शकते. पण त्यासाठी पालकमंत्री राम शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आधार घेऊन राजकिय प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे.