बँकेचे नियम पाळून नूतन पदाधिकाऱ्यांनी कारभार करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:19 IST2021-03-07T04:19:18+5:302021-03-07T04:19:18+5:30
अहमदनगर : जिल्हा बँक ही सर्वसामान्यांची बँक असून आतापर्यंत बँकेचा लौकिक टिकून आहे. त्यामुळे नवीन पदाधिकाऱ्यांनी बँकेचे सर्व नियम ...

बँकेचे नियम पाळून नूतन पदाधिकाऱ्यांनी कारभार करावा
अहमदनगर : जिल्हा बँक ही सर्वसामान्यांची बँक असून आतापर्यंत बँकेचा लौकिक टिकून आहे. त्यामुळे नवीन पदाधिकाऱ्यांनी बँकेचे सर्व नियम पाळून, तसेच पारदर्शी कारभार करावा, अशा कानपिचक्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अध्यक्ष-उपाध्यक्षांसह सर्वच संचालक मंडळाला दिल्या.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे उदय शेळके व उपाध्यक्षपदी काँग्रेसचे माधवराव कानवडे यांची निवड झाल्यानंतर थोरात यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा बँकेच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आशिया खंडातील ही नावाजलेली सहकारी बँक आहे. कारखाने तसेच शेतकऱ्यांना कर्जरूपी मदत करून जिल्ह्याच्या विकासात बँकेची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. आतापर्यंतच्या धुरिणांनी बँक कुटुंबाप्रमाणे सांभाळली. बँकेची सर्व निवडणूकच बिनविरोध करण्याचा आमचा मानस होता. परंतु काही जागांसाठी निवडणूक झाली. आताच्या निवडीत नव्या-जुन्यांचा मेळ घालण्यात आला आहे. उदय शेळके यांना बँकेचा चांगला अनुभव आहे. कानवडे यांनीही संगमनेर कारखान्याचा कारभार सांभाळलेला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांची नावे अंतिम झाली, असे थोरात म्हणाले.
नव्या पदाधिकाऱ्यांना बँकेचा कारभार चांगला करण्याची संधी आहे. सर्व संचालकांनी नियमित बैठकांना उपस्थित राहावे. यापुढे बँकेच्या नियमात व शिस्तीने कारभार करावा, बँकेची थकबाकी कमी करण्याचे नियोजन करा, असे आवाहन थोरात यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना केले.
मंत्री शंकराव गडाख यांनी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत आपले पूर्ण सहकार्य बँकेसाठी असेल, असे सांगितले. नूतन अध्यक्ष शेळके व उपाध्यक्ष कानवडे यांनी, सर्वांच्या सहकार्याने बँकेचा कारभार उत्तम करण्याची ग्वाही दिली.
-------
फोटो - ०६ पदाधिकारी सत्कार
जिल्हा बँकेचे नूतन अध्यक्ष उदय शेळके व उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांचा सत्कार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते बँक सभागृहात करण्यात आला.