‘राघो’च्या घरी जाण्याची नेहरुंची इच्छा अपुरी!
By Admin | Updated: May 27, 2014 00:31 IST2014-05-27T00:25:22+5:302014-05-27T00:31:40+5:30
योगेश गुंड, अहमदनगर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु नगर किल्ल्यात बंदिवासात असताना त्यांची सेवा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या एका कैद्याला पंडितजींचा जवळून सहवास मिळाला.

‘राघो’च्या घरी जाण्याची नेहरुंची इच्छा अपुरी!
योगेश गुंड, अहमदनगर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु नगर किल्ल्यात बंदिवासात असताना त्यांची सेवा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या एका कैद्याला पंडितजींचा जवळून सहवास मिळाला. एका सर्वसामान्य कै द्याने पंडितजींची बंदिवासात केलेली सेवा पंडितजींनी आयुष्यभर स्मरणात ठेवली. त्यांच्यातील ‘स्नेहबंध’ इतका वृद्धिंगत झाला की, अहमदनगर आऊँगा तो तेरे घर आकर जाऊँगा, हा शब्द पंडितजींनी दिला खरा पण तो पूर्ण होण्याआधीच पंडितजींनी जगाचा निरोप घेतला. त्याला आज ५० वर्षे पूर्ण झाली असली तरी नगरचा भुईकोट किल्ला त्यांच्या स्नेहाचा साक्षीदार बनला. १९४२ च्या आंदोलनात पंडित नेहरूंसह काही राष्ट्रीय नेत्यांना नगरच्या किल्ल्यात स्थानबद्ध करण्यात आले होते. जवळपास तीन वर्षे ते याच किल्ल्यात बंदिवासात होते. पंडितजी किल्ल्यातील ज्या खोलीत स्थानबद्ध होते, त्या खोलीच्या व्यवस्थेसाठी जेलरने राघू तुकाराम जंजीरे या कर्जतमधील कैद्याची नेमणूक केली. राघू कै दी म्हणून नगरच्या तुरुंगात होता. पण थोड्याच दिवसात त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. मात्र त्यास पुन्हा नगरला आणण्यात आले. जेलरने त्यांची नेमणूक पंडितजींच्या व्यवस्थापनेत केली. पंडितजींच्या सहवासामुळे राघूचे जीवनच धन्य झाले. पंडितजींची सेवा करताना आपल्याला तुरुंगवास नव्हे तर देशाची सेवा करण्याचा मान मिळाल्याची भावना राघू व्यक्त करीत असे. जेवणाच्या वेळी ताट वाढणे, पाणी देणे, बिछाना तयार करणे, खोलीची व्यवस्था ठेवणे अशी कामे राघूकडे सोपविण्यात आली होती. राघू सर्व कामे आनंदाने, व्यवस्थित व मन लावून करीत असल्याने पंडितजी त्याच्या सेवेवर खूश असत. ते केव्हाही अगदी अर्ध्या रात्री सुद्धा ‘राघो’ अशी हाक मारत. राघू चटकन पंडितजींसमोर हजर राही. दिवसभर किल्ल्याचा परिसर पंडितजींच्या ‘राघो’ या हाकेने गजबजून जायचा. सवडीच्यावेळी पंडितजी नेहमीच राघूच्या बरोबर गप्पा मारत. त्याच्या घरच्या परिस्थितीची आपुलकीने विचारपूस करीत. त्याची गरिबी, त्याने केलेला गुन्हा, त्याला झालेली शिक्षा, त्याची वागणूक याबद्दल विचारपूस करीत आणि राघुनी सांगितलेले वास्तव ऐकून पंडितजींचेही डोळे ओले होत. काही दिवसांनी राघूची तुरुंगातून सुटका केली. बाहेर निघताना पंडितजींना नमस्कार केला. पंडितजींनी त्याचे दोन्ही हात आपल्या हातात धरुन प्रेमाने मिठी मारली आणि दिल्लीला येऊन पुन्हा भेटण्याचे सांगितले. ‘माझ्या वडिलांना पंडितजींची सेवा करण्याची संधी मिळाली, हे आमच्या कुटुंबाचे भाग्यच. माझे वडील म्हणायचे पंडितजी भेटले म्हणजे परमेश्वर भेटल्याचा आनंद होत. वडिलांची पंडितजींसमवेत तीनदा भेट झाली. त्यांनी वडिलांना पिंपळवाडी (कर्जत) येथे जमीन दिली. सर्वसामान्य माणसांबरोबर त्यांनी ठेवलेला ‘स्नेह’ मोठा होता. पंतप्रधान झाल्यावरही त्यांनी आठवण ठेवली. हेच आमचं भाग्य.’ - अंकुशराव जंजीरे (राघू जंजीरे यांचे चिरंजीव).पंडितजी बंदिवासातून सुटले. पुढे ते पंतप्रधान झाले. राघू मेळाव्याच्या निमित्ताने पंडितजींची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेला. त्याने पंडितजींना फोन करुन भेटण्यासाठी वेळ मागितला. त्यावेळी ते गडबडीत होते. ‘राघो तू दिल्ली में आया खुशी हुई, लेकिन तेरे अकेले की मुलाकात होना मुश्किल है, मै थोडे ही दिनों में अहमदनगर आऊँगा, तो तेरे घर आकर जाऊँगा.’, असे सांगितले. त्यावेळी भेट होऊ शकली नाही. नगरलाच झाली पुन्हा भेट पंडित नेहरु पंतप्रधान झाल्यावर दोनदा नगरला आले. त्यावेळी त्यांनी नगरच्या किल्ल्याला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. किल्ल्यात गेल्यावर त्यांना ‘राघू’ची आठवण झाली. कलेक्टरच्यामार्फत राघुचा शोध घेऊन त्याची व पंडितजींची १९५२ मध्ये भेट झाली. जुन्या आठवणींनी दोघांचेही डोळे पाणावले होते. सर्वसामान्यांची त्यांनी ठेवलेली ‘आठवण’ पाहून सर्वांनाच गहिवरुन आले.१९६१ ला पंडितजी पुन्हा नगरला आले. नगरच्या किल्ल्यात फेरफटका मारत असताना त्यांना ‘राघू’ची आठवण झाली. गर्दीत राघू असणार म्हणून त्यांनी हाक मारली. गर्दीतून राघू पुढे आला. राघूचा हात धरुन त्याला पंडितजींनी आपल्या बरोबर बैठकीत नेले. शेजारी खुर्चीत त्याला बसवून दूध दिले. या भेटीने व प्रेमाने राघूचे अंत:करण भरुन आले. त्याने पंडितजींचे पाय धरले. पंडितजींनी आपल्या मोटारीत त्याला बसवून कलेक्टरकडे नेले. त्याला जमीन बक्षीस म्हणून दिली. राघूने घरी येण्याची विनंती करताच पंडितजींनी ‘तुम मिले, बडी खुशी हो गई.. अगले अहमदनगर दौरे में जरुर घर आऊँगा. ’, असे सांगितले. पण त्या राघुची अन् पुन्हा पंडितजींची भेटच झाली नाही. काळाने २७ मे १९६४ मध्ये पंडितजींना नेले ते कायमचेच.