राष्ट्रीय मान्यता गोठविण्याची राष्ट्रवादीला नोटीस
By Admin | Updated: June 20, 2014 00:42 IST2014-06-20T00:42:15+5:302014-06-20T00:42:47+5:30
सुधीर लंके, अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष (बसपा) व भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटिसा बजावल्या आहेत.

राष्ट्रीय मान्यता गोठविण्याची राष्ट्रवादीला नोटीस
सुधीर लंके, अहमदनगर
लोकसभा तसेच विविध राज्यांच्या विधानसभांमध्ये आवश्यक असणारी मते व जागा मिळालेल्या नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष (बसपा) व भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मान्यता गोठविण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी या तीन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा उडणार हे जवळपास निश्चित आहे.
पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकविण्यासाठी असलेल्या विविध अटींची पूर्तता होत नसल्याने या पक्षांचा हा दर्जा धोक्यात आला असल्याचे वृत्त केवळ ‘लोकमत’ने २१ मे रोजी आकडेवारीसह प्रकाशित केले होते. ‘लोकमत’चा हा अंदाज बरोबर ठरला आहे. निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव के.एफ. विलफर्ड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पक्षांना नोटीसा बजावण्यात आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. राष्ट्रीय मान्यता गोठविण्यात का येऊ नये? यासंदर्भात या पक्षांचे म्हणणे मागविण्यात आले असून ते सादर झाल्यानंतर पुढील कार्यवाही होईल असे ते म्हणाले. या सुनावणीच्या प्रक्रियेला साधारण तीन महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी याबाबतचा निर्णय होईल. राष्ट्रीय मान्यता गोठल्यास राष्ट्रवादी हा राज्यात शिवसेना, मनसे या पक्षांसारखाच केवळ राज्य पक्ष म्हणून ओळखला जाईल. राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ चिन्ह राज्यात कायम राहील परंतु राष्ट्रीय पक्ष म्हणून मतपत्रिकेवर असणारे वरचे स्थान त्यांना मिळणार नाही.
बसपा व भाकपा या पक्षांना महाराष्ट्रात राज्य पक्ष म्हणूनही दर्जा नाही. त्यामुळे या पक्षांना येत्या विधानसभा निवडणुकीत आपले ‘हत्ती’ व ‘विळाकणीस’ हे चिन्ह गमवावे लागणार आहे. चिन्ह हवे असेल तर त्यांना निवडणूक आयोगाकडे तसा अर्ज करावा लागेल. तरच ते त्यांना मिळू शकेल.
लोकसभा निवडणुकीत बसपाला एकही जागा मिळाली नसून राष्ट्रवादीला सहा तर भाकपाला अवघी एक जागा मिळाली आहे. बसपाचा केवळ मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व उत्तराखंडमध्ये तर भाकपाला केवळ केरळ व तामिळनाडूत राज्य पक्षांचा दर्जा उरला आहे.
तृणमूलची राष्ट्रीय मान्यतेची संधी हुकली
तृणमूल काँग्रेसला सध्या अरुणाचल प्रदेश, मणिपूर व पश्चिम बंगालमध्ये राज्य पक्षांचा दर्जा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्रिपुरातही त्यांना राज्य पक्षाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. चार राज्यांत राज्य पक्षाचा दर्जा असेल तर राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते. तृणमूलला ही संधी होती. परंतु अरुणाचल विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाची काहीच कामगिरी नसल्याने तेथे त्यांचा राज्य पक्षाचा दर्जा धोक्यात आला आहे. निवडणूक आयोग याबाबत तपासणी करत आहे.
नागालँडमध्येही अडचण
राष्ट्रीय मान्यता धोक्यात आलेल्या राष्ट्रवादीला सध्या महाराष्ट्र व नागालँड या दोन ठिकाणीच राज्य पक्षाचा दर्जा उरला आहे. नागालँड विधानसभेच्या २०१३ च्या निवडणुकीत या पक्षाला चार जागा व सहा टक्के मते मिळाली होती. परंतु नुकतेच यातील तीन आमदार भाजपात गेल्याने येथील राज्य पक्ष म्हणून असलेला दर्जाही अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे ‘नॅशनॅलिस्ट’ म्हणविणारा हा पक्ष केवळ महाराष्ट्रापुरता उरण्याचा धोका आहे.