राष्ट्रवादी,भाजपा कार्यकर्ते भिडले

By Admin | Updated: June 17, 2016 23:38 IST2016-06-17T23:25:06+5:302016-06-17T23:38:32+5:30

जामखेड : भाजपा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीवरुन अरणगाव (ता. जामखेड) येथे जोरदार हाणामारी झाली.

Nationalist, BJP workers clashed | राष्ट्रवादी,भाजपा कार्यकर्ते भिडले

राष्ट्रवादी,भाजपा कार्यकर्ते भिडले

जामखेड : भाजपा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीवरुन अरणगाव (ता. जामखेड) येथे जोरदार हाणामारी झाली. यामध्ये रिव्हॉल्व्हर, गज, काठ्या व फरशींचे तुकडे यांचा वापर झाला.
याबाबतची पहिली फिर्याद बुधवारी सायंकाळी पाच वाजता दाखल झाली. अरणगाव गावातील चौफुल्यावर फिर्यादी संभाजी शिंदे यांच्या मालकीचे हॉटेल चालवत असलेले निवृत्ती चव्हाण, राजेंद्र निगुडे, राजेंद्र शिंदे व त्यांचा मुलगा अतुल बसले असताना गावातील सोनू चावरे, सोमनाथ दळवी, लहू शिंदे, अंकुश शिंदे, रमेश गणगे, संतोष निगुडे, पिंटू शिंदे, पप्पू भोगे, मुनीर शेख, अमोल शिंदे यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून आरोपी लहू शिंदे याने हॉटेल मालक संभाजी कोंडीराम शिंदे यास ‘तू आमच्याविरुद्ध ग्रामपंचायत निवडणुकीला का उभा राहिला म्हणून धक्काबुक्की करून शिवीगाळ केली व त्याच्याबरोबर आलेल्या इतर नऊ जणांनी हॉटेलमधील खुर्च्या, टेबल, रांजण व इतर साहित्याची मोडतोड करून नुकसान केले, असे या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान या फिर्यादीनुसार पोलिसांनी या आरोेंंपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदर फिर्याद दाखल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याची खदखद होती. त्यानंतर राम गोवर्धन सोले (वय २३) यांनी गुरुवारी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या विरोधात पहिली फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे, अरणगाव शिवारातील गट नं ४८६ (२) मधील एका हॉटेल बांधकामाची पाहणी करण्यासाठी फिर्यादी राम सोले व त्याच्याबरोबर लहू शिंदे व कृष्णा शिंदे गेले होते. तेथे काही कारण नसताना आरोपी माजी सरपंच संतोष पंढरीनाथ निगुडे, चंद्रकांत बाबासाहेब राऊत, भाऊ पंढरीनाथ शेळके, अंगद बलभिम निगुडे, कैलास अप्पा निगुडे, अविनाश बाळासाहेब निगुडे, केशव मारुती निगुडे, संभाजी कोंडीराम शिंदे, सत्यवान दादासाहेब नन्नवरे, सागर जगन्नाथ राऊत, संदीप परमेश्वर निगुडे, बाळासाहेब निवृत्ती निगुडे, राजेंद्र बाबुराव निगुडे यांनी ‘तुमची गावात सत्ता आल्याने वर्चस्व वाढले आहे का’, असे म्हणून रिव्हॉल्वर घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच ‘तू येथे कसा राहतो ते मी बघून घेतो, अशी धमकी दिली. आरोपी चंद्रकांत बाबासाहेब राऊत याने त्याच्या हातातील गजाने कृष्णा शिंदे यास मारहाण केली तसेच आरोपी भाऊ पंढरीनाथ शेळके याने सरपंच यांचे पुत्र लहू शिंदे यांचा गळा दाबून व तुला संपवून टाकीन, असा दम दिला तसेच आरोपींनी काठ्या, फरशीच्या तुकड्याने कृष्णा शिंदे व लहू शिंदे यांना मारहाण करून त्यांच्याकडील ७ ग्रॅम सोन्याची अंगठी तसेच कृष्णा शिंदे यांच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याची चेन असे एकूण ५१ हजार रुपये सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी फिर्याद भाऊसाहेब शेळके याने दिली. फिर्यादीत म्हटले आहे, बुधवारी दुपारी बारा वाजता घरी असताना आरोपी लहू शिंदे याने त्याच्याबरोबर अंकुश शिंदे, अमोल शिंदे, दादा शिंदे, रमजान शेख, मुन्ना शेख, गोकूळ गणगे, सोमा दळवी, राम सोले, महेश सोले, तात्या मोहळकर, दत्ता नन्नवरे, संतोष नन्नवरे, रमेश गणगे, अमर गणगे, पिंटू शिंदे, पिनू शिंदे, महेश सोले असे १९ जण जमले होते. त्यांनी फिर्यादी भाऊसाहेब शेळके यास घरातून बाहेर बोलावून आम्हाला मारहाण करण्यास मुले गोळा करतो का? असे म्हणून अमोल शिंदे व महेश सोले यांनी फिर्यादी शेळके याची गचांडी धरून खाली पाडले व नरडे दाबले. अमोल शिंदे याने डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून ‘तुला मी खलास करील’ असे म्हणून जिवे मारण्याचा प्रयत्न केला व इतर आरोपींनी शिवीगाळ करुन मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवन पोलिसांनी शिवीगाळ, मारहाण व आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
घटना बुधवारी, गुन्हा गुरुवारी दाखल
विद्यमान सरपंच जनाबाई शिंदे यांचा मुलगा व माजी सरपंच संतोष निगुडे यांच्या समर्थकांमध्ये मारहाण होऊन यात चार जण जखमी झाले. जामखेड पोलीस ठाण्यात याबाबत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून एकून ३२ जणांविरुद्ध दरोडा, मारामारी व आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. राष्ट्रवादीचे १३ व भाजपाच्या १९ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल आहे. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली, मात्र गुन्हा गुरुवारी रात्री दहा वाजता दाखल झाला. बुधवारी सायंकाळी हॉटेलच्या मोडतोड प्रकरणी सरपंचांची मुले व त्यांचे समर्थक अशा दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. एकूण तीन निरनिराळ्या गुन्ह्यात ४२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
सोशल मीडियावरील भाष्य ठरले कळीचा मुद्दा
अरणगाव येथे भाजपा व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमधील हाणामारीला ग्रामपंचायत निवडणूक व सोशल मीडियावर राजकीय पक्षातील भाष्य कारणीभूत ठरले आहे. आठ दिवसांपूर्वी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टरवरून वातावरण धगधगत होते. ग्रामपंचायत निवडणूक वर्षापूर्वी झाली आहे. तीन निरनिराळ्या फिर्यादीत ४२ जणांविरुध्द गुन्हे दाखल झाले आहेत. सर्व आरोपी फरार असून गावात शांततापूर्ण वातावरण आहे. घडलेल्या घटनेची गावत दबक्या आवाजात चर्चा आहे.

Web Title: Nationalist, BJP workers clashed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.