‘निळवंडे’च्या उच्चस्तरीय कालवा कामाला मुहूर्त
By Admin | Updated: May 27, 2014 00:28 IST2014-05-27T00:03:59+5:302014-05-27T00:28:31+5:30
जलसंपदा : १ जूनला जलसंपदामंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
‘निळवंडे’च्या उच्चस्तरीय कालवा कामाला मुहूर्त
‘निळवंडे’च्या उच्चस्तरीय कालवा कामाला मुहूर्त राजूर : निळवंडे धरणाच्या अकोले तालुक्यातील धरणस्थळाजवळील १२० मीटर लांबीच्या उच्चस्तरीय कालव्याच्या बोगद्याचे (टनेल) भूमिपूजन राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते व मंत्री पिचड यांच्या अध्यक्षतेखाली १ जून रोजी सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती जि.प. सदस्य वैभव पिचड व राष्टÑवादीचे सचिव यशवंत आभाळे यांनी दिली. निळवंडे धरणाचे काम अंतिम टप्प्यात असतानाच धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांचे कामही प्रगतीपथावर आहे. तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकर्यांच्या मागणीनुसार धरणास कालव्यांबरोबर उच्चस्तरीय बंद पाईपद्वारे डावे व उजवे कालवे आहेत. या कालव्याद्वारे पाणी सोडण्यासाठी ६२७.४३ मीटर तलाकाला टनेलचे काम करणे बाकी आहे. १२० मीटर लांबीच्या या बोगद्याचा व्यास अडीच मीटर इतका असून, त्यासाठी २ कोटी ५ लाख रुपयेही मंजूर करण्यात आले आहे. सदर काम ४० ते ४५ दिवसात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून काम पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील शेतकर्यांना या उच्चस्तरीय बंद पाईपद्वारे पाणी देण्यात येणार आहे. यात डाव्या कालव्याद्वारे निंब्रळ, म्हाळादेवी, मेहंदूरी, बहिरवाडी, उंचकखडक खुर्द, ठोकरी, टाकळी, आगार, गर्दणी, खानापूर, तांभोळ, रेडे, सुगाव, कुंभेफळ, कळस खुर्द या सुमारे २० किमी लांबीच्या पाईपद्वारे तर रूंभोडी, इंदोरी, अंबड, औरंगपूर, उंचखडक बुद्रूक, नवलेवाडी, धुमाळवाडी, अकोले, धामणगाव आवारी, अगस्तीनगर, परखतपूर, वाशेरे, सुगाव बुद्रूक, मनोहरपूर, कळस बुद्रूक, सुलतानपूर या उजव्या कालव्याखालील गावांना याचा लाभ होणार आहे. उजव्या पाईप बंद कालव्याची लांबी सुमारे १९ किलोमीटर इतकी आहे. निळवंडे धरणाच्या कामाची पाहणीही हे मंत्रीद्वय करणार आहेत. याप्रसंगी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली तर मंत्री तटकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात केले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहनवैभव पिचड, गिरजाजी जाधव, सचिन आभाळे यांनी केले आहे. (वार्ताहर)