दिवसाआड पाण्यात महावितरणचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST2021-07-14T04:24:04+5:302021-07-14T04:24:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणात मुबलक पाणीसाठा आहे. परंतु,पाणी योजनेवरील विद्युत पुरवठा दररोज वेगवेगळ्या ...

दिवसाआड पाण्यात महावितरणचा खोडा
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणात मुबलक पाणीसाठा आहे. परंतु,पाणी योजनेवरील विद्युत पुरवठा दररोज वेगवेगळ्या कारणाने खंडित होतो. त्यामुळे नगरकरांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे.
नगर शहराला मुळा धरणातून पाणीपुरवठा होताे. पावसाळा सुरू असला तरी मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झालेली नाही. मागीलवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे मुळा धरणात सध्या ९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणीपातळी जेमतेम आहे. पाणीपातळी खाली गेल्यानंतर शहराला कमी पाणीपुरवठा केला जातो. साधारणपणे जून व जुलै महिन्यांत ही परिस्थिती उदभवते. परंतु, चालूवर्षी मुळा धरणात मुबलक पाणीसाठा आहे. असे असतानाही गेल्या १५ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मुळानगर येथील विद्युत पुरवठा गेल्या २६ जूनपासून दररोज खंडित होत आहे. मुळा धरणात ५ मिनिटे जरी विद्युतपुरवठा खंडित झाला तरी पाणीपुरवठा सुरळीत होण्यास साधारणपणे २ तास लागतात. त्यामुळे शहरातील पाण्याच्या टाक्या भरण्यास विलंब होऊन पाणीपुरवठा विस्कळीत होतो. शहर व परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सावेडी उपनगरातील प्रभाग क्रमांक-२ मधील नगरसेवकांनी ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली असून, पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
.....
शहरातील बोअरवेल्स
७००
...
नळ जोडणी
६५ हजार
...
दररोजचा पाणी उपसा
७२ एमएलडी
....
लोकसंख्या
४ लाख ४५ हजार
......
या भागांना चार दिवसांनी पाणी
शहरातील केडगाव व मुकुंदनगर भागात चार दिवसातून एकदा पाणी मिळते. त्यात ते कमी दाबाने येते. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.
...
शिवाजीनगरला आठ दिवसांनी पाणी
कल्याण रोडवरील शिवाजीनगर भागातील नागरिकांना तब्बल आठ दिवसांनी पाणी येते. पाण्याच्या मागणीसाठी या भागातील नगरसेवकांनी आंदोलन केले. आमदार, व महापौरांनी शिवाजी नगरच्या पाणी प्रश्नाबाबत वेळोवेळी बैठका घेतल्या. महापौर रोहिणी शेंडगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिली बैठक शिवाजी नगरच्या पाणी प्रश्नाबाबत घेतली. परंतु, या भागातील पाण्याचा प्रश्न जैसे थै आहे.
.......
वसंतटेकडी येथे विजेचा लपंडाव
मुळा धरणातून जलवाहिनीद्वारे पाणी शहरातील वसंत टेकडी येथे येते. तेथून ते शहरातील विभागातील जलकुंभामध्ये सोडले जाते. तसेच वसंत टेकडी येथील जलकुंभातून मोटारीद्वारे ही काही भागाला पाणीपुरवठा होतो. वसंत टेकडी येथील विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे पाईपलाईन रोड, सारसनगर, निर्मलनगर, केडगाव उपनगराला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
.....
असा झाला विद्युत पुरवठा खंडित
२६ जून- १५ मिनिटे
२७ जून ५० मिनिटे
२८ जून-०५ मिनिटे
२ जुलै- ०५ मिनिटे
३जुलै- २० मिनिटे
४ जुलै- २० मिनिटे
५ जुलै- ३० मिनिटे
७ जुलै- २० मिनिटे
८ जुलै- २५ मिनिटे
९ जुलै - ४ तास
१० जुलै- ४ तास
११ जुलै- २० मिनिटे
१२ जुलै- दुपारी १२ पर्यंत
...
सूचना सदर विषय डमीचा आहे.