खासदार झाले शहराचे अध्यक्ष!

By Admin | Updated: March 31, 2016 00:03 IST2016-03-31T00:01:47+5:302016-03-31T00:03:37+5:30

अहमदनगर : तीन महिन्यांपासून रखडलेल्या भाजपा शहराध्यक्षपदाच्या नावाची अखेर बुधवारी घोषणा झाली.

MP became President of the city! | खासदार झाले शहराचे अध्यक्ष!

खासदार झाले शहराचे अध्यक्ष!

अहमदनगर : तीन महिन्यांपासून रखडलेल्या भाजपा शहराध्यक्षपदाच्या नावाची अखेर बुधवारी घोषणा झाली. नगर दक्षिण जिल्ह्याचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांची शहर जिल्हाध्यक्षपदी (महानगर) वर्णी लागली आहे. या पदाचे दावेदार अ‍ॅड. अभय आगरकर यांना डावलण्याच्या प्रयत्नात खासदार गांधीच शहर जिल्हाध्यक्ष झाल्याने पक्षीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त झाले आहे.
भाजपामध्ये अंतर्गत पदाधिकारी निवड प्रक्रिया तीन महिन्यांपासून राबविण्यात येत होती. प्रदेशाध्यक्ष जाहीर झाल्यानंतर जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्याचे अधिकार प्रदेशाध्यक्षांनाच आहेत. त्याप्रमाणे कोअर कमिटीने सूचविलेल्या नावांचाच विचार प्रदेशाध्यक्षांकडून केला जातो. ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रा. भानुदास बेरड यांची गेल्या महिन्यात नियुक्ती झाली. त्यानंतर शहर जिल्हाध्यक्षपदासाठी रस्सीखेच लागली होती. विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांच्यासह डझनभर आजी-माजी पदाधिकाऱ्यांची नावे शहर जिल्हाध्यक्षपदासाठी चर्चेत होती. आगरकर-गांधी यांच्या गटामध्ये पदासाठी जोरदार रस्सीखेच होती. या स्पर्धेत खासदार गांधी यांचे कुठेही नाव नव्हते. त्यांचे पुत्र नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी शहर जिल्हाध्यक्षपदाची इच्छा व्यक्त केली होती. प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी बुधवारी जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली. त्यामध्ये नगरच्या अध्यक्षपदी गांधी यांचे नाव जाहीर झाले आणि गांधी विरोधकांच्या भुवया उंचावल्या.
खासदार गांधी यांनी प्रदेशाध्यक्षांकडे सुवेंद्र गांधी किंवा स्वत:लाच अध्यक्षपद द्यावे अशी आग्रही मागणी लावून धरली होती, अशी माहिती आहे. खासदार गांधी हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. त्यात नगर दक्षिणेचे खासदार आहेत. केंद्र सरकारच्या अनेक समित्यांवर ते कार्यरत आहेत.
तसेच काही काळ ते भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष होते, असे असताना गांधी यांच्या पदरात शहर अध्यक्षपद देवून पक्षाने काय साधले? गांधी हे अध्यक्ष झाले म्हणजे एखादा मंत्री सरपंच झाल्यासारखे आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत.
दरम्यान अ‍ॅड. अभय आगरकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी मी कधीही इच्छा व्यक्त केली नव्हती, तसेच या स्पर्धेतही उतरलो नव्हतो.
(प्रतिनिधी)
शहर जिल्हाध्यक्षपदाच्या स्पर्धेत मी कधीही नव्हतो. या पदासाठी मी कोणतीही शिफारस केली नव्हती. मी अध्यक्ष व्हावे, असे प्रदेशाध्यक्षांना वाटले असेल तर त्यात गैर काय? पक्ष संघटनेमध्ये पदापेक्षा काम करणे महत्त्वाचे आहे. पक्ष संघटना मजबूत करण्याची जबाबदारी पक्षाने माझ्यावर सोपविली आहे. कोणतीही जबाबदारी ही लहान-मोठी असत नाही. पदापेक्षा कामालाच महत्त्व देत आलो आहे. त्यामुळे या पदालाही न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू. -दिलीप गांधी, खासदार

Web Title: MP became President of the city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.