डेस्टिनेशनकडे वाटचाल

By Admin | Updated: May 27, 2016 23:24 IST2016-05-27T23:00:06+5:302016-05-27T23:24:40+5:30

गौरवशाली इतिहासाचा वारसा लाभलेल्या अहमदनगर शहराने ५२६ वर्षांची वाटचाल पूर्ण केली़ सोळाव्या आणि सतराव्या शतकात भारतातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र म्हणून नगरचा मोठा नावलौकिक होता़

Moving to Destination | डेस्टिनेशनकडे वाटचाल

डेस्टिनेशनकडे वाटचाल

गौरवशाली इतिहासाचा वारसा लाभलेल्या अहमदनगर शहराने ५२६ वर्षांची वाटचाल पूर्ण केली़ सोळाव्या आणि सतराव्या शतकात भारतातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र म्हणून नगरचा मोठा नावलौकिक होता़ निजामशाहीत वैभवशाली राजधानीचे शहर म्हणूनही नगर ओळखले जायचे़ गेल्या पाच शतकांच्या कालखंडात या शहराने अनेक राजे, महाराजांचा, शाही, पेशवाई आणि इंग्रजांचा काळ आपल्या उदरात सामावून ठेवला आहे़ या ऐतिहासिक वैभवाची आठवण करून देणाऱ्या जुन्या वास्तू आणि स्थळे या शहरात आजही जीर्ण अवस्थेत उभी आहेत़स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात केवळ राजकीयच नव्हे तर लष्करी, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातही या शहराने लौकिक मिळविला़ गेल्या ३० ते ३५ वर्षांत मात्र, या शहराचा अपेक्षित असा विकास झाला नाही़ इतिहासाचे सिंहावलोकन करताना मधला काळ शहरासाठी ठप्पच राहिला असेच शहराच्या स्थापना दिनानिमित्त म्हणावे लागते़
अहमदनगर शहरापासून जवळच असलेल्या आष्टी तालुक्यातील कडा येथे माझा जन्म झाला. त्यामुळे लहानपणापासूनच नगर हे नाव मनावर कोरले गेले. नगर हे एकमेव खरेदीचे ठिकाण म्हणून परिसरात ओळख होती. येथील कापड खरेदीसाठी येणे एक पर्वणी असायची. थोडंसं मोठं झाल्यानंतर शिक्षणाचा विषय निघायचा, त्यावेळी नगर शहराचं नाव प्रामुख्याने समोर यायचं. पुण्यात शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने नगरला शिक्षणासाठी प्राधान्य दिले जायचे. वैद्यकीय सुविधाही नगरला चांगल्या होत्या. कोणत्याही शहराच्या ठिकाणी जाताना नगरहून जावे लागते अशी संकल्पना त्याकाळीच मनात रुजली होती. आज नगरला उपायुक्त म्हणून काम करत असताना या ऐतिहासिक शहराचा सर्वांगीण विकास व्हावा अन् विकासाची लक्ष्यपूर्ती व्हावी हेच उद्दिष्ट असून, त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे़
राज्यात अनेक ठिकाणी नोकरीनिमित्त राहिलो. तेथेही नगरबद्दल नेहमीच वेगळेपण ऐकत गेलो. आॅगस्ट २०१४ मध्ये अहमदनगर महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून रूजू झालो. एलबीटीच्या निमित्ताने येथील व्यापाराची माहिती होत गेली. वाढती वाहनांची संख्या, जुन्या शहरात झालेले अतिक्रमणं याची माहिती झाल्यानंतर नगरच्या मार्केटचा अभ्यास सुरू केला. कापड खरेदी हे नगरचे एकेकाळी भूषण होते. पण पूर्वीसारखी खरेदी आता राहिलेली दिसत नाही. नगरचे हे भूषण इतर शहरांनी काबीज केलं. याचा अर्थ नगरला खरेदी करणे लोकांना आवडत नाही असा नाही, आजही लोक कापड खरेदीसाठी नगरला पसंती देतात. कुटुंबीयांसोबत नगरला कापड खरेदीसाठी येतात, कारण इतर शहराच्या तुलनेत नगरला कापड स्वस्त मिळते.
येथील मार्केटच्या समस्या समजल्यानंतर १५ कलमी कार्यक्रम तयार करून तो हाती घेतला. नगरच्या मार्केटला बळकटी कशी देता येईल यादृष्टीने काम करण्यास सुरूवात केली. शहराची लोकसंख्या वाढली पण शहराने आत्मा गमावलेला नाही. जुने वैभव आजही येथे टिकून आहे. नगरच्या ख्याती आजही दूरवर आहे. ती आणखी बळकट कशी करता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले. शहरातील बाजारपेठेतील अतिक्रमणे काढून पार्किंगची सुविधा करण्याचे प्रयत्न सुरू केले. पार्किंगची सुविधा नसल्याने लोक खरेदी करण्यास दुसरीकडे जातात ही बाब मला लक्षात आली होती. जुन्या शहराच्या तुलनेत उपनगराचा विकास झपाट्याने झाला आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी उपनगरातही दालने सुरू केली आहे. शहराची वैशिष्टये टिकविण्यासाठी बीओटी, एफबीटी तत्वावर पार्किंगची सुविधा निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. मल्टीनॅशनल कंपन्यांशी यासंदर्भात चर्चा सुरू आहे. शहराचा व्यापार वाढविण्यासाठी व्यापाऱ्यांच्या नेमक्या समस्या जाणून घेतल्या.
नगर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे ही काळाजी गरज बनली आहे. नगर शहरात शहर बस वाहतूक सुरू असली तरी तिला वाढीला मोठा स्कोप आहे. ही व्यवस्था आणखी मजबूत करावी लागणार आहे. नगर शहरात मोठा ऐतिहासिक ठेवा आहे. त्याला जगासमोर आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहे. त्यादृष्टीने नगर शहराचे स्वतंत्र अ‍ॅप तयार केले आहे. शहर विकासाची प्रक्रिया ही सर्वसमावेशक असणार आहे. व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, सामाजिक संस्था, जिल्हा प्रशासन व महानगरपालिका सर्वांना सोबत घेऊन विकासाची संकल्पना पुढे नेली जाईल. ती यशस्वी झाली तर नगरचे चित्र एकदम पलटून गेल्याचे पहावयास मिळेल. नगरचं वेगळं रूप अ‍ॅपच्या माध्यमातून जगासमोर जाईल.
नगर शहराच्या बाजूने बायपास असला तरी भौगोलिक परिस्थितीचा विचार करता बायपास ऐवजी अन्य मार्गाचा वापर वाहनधारकांकडून होतो. नगर शहराचा समावेश स्मार्ट सिटीत नसला तरी नगरला स्मार्ट सिटीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मॉडेल वार्ड, मॉडेल रस्ते ही संकल्पना मांडली. शासन निधीतून पाणी पुरवठा योजना बळकटीकरणाचे प्रयत्न सुरू आहे. अमृत योजनेतून मिळणाऱ्या निधीतून सोलर यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यासंदर्भात काही कंपन्यांशी चर्चाही झाली आहे. नगर शहरात झाडांची संख्या कमी आहे ही मोठी चिंतेची बाब आहे. मात्र महापालिकेने यंदा पाच लाख झाडांचे वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. नगर शहरात एक लाख मालमत्ता असल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी आहे.
एका मालमत्ताधारकाने पाच झाडे लावली तरी ग्रीन सिटी ही संकल्पना अस्तित्वात येण्यास फार वेळ लागणार नाही. घराच्या मोकळ्या जागेत, सार्वजनिक ठिकाणी हे वृक्षारोपण केले जाईल. शाळा, कॉलेजसोबत टायअप केला जाईल. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणी संकट येऊ शकते. त्यादृष्टीने उपाययोजना म्हणून आता इमारतींना रेन वॉटर हार्र्वेस्टिग सक्तीचे केले आहे. शहरातील चौकांचे सुशोभिकरण केले जाणार आहे. खासगी संस्था अथवा कंपन्यांनी त्यासाठीचे प्रस्ताव दिले आहेत. सुशोभिकरणाच्या माध्यमातून नगरचं रूप बदलेल. थोडक्यात नगर शहर स्वच्छ, सुंदर व स्मार्ट च्या दिशेने वाटचाल करेल!
इको बससेवा
अजिंठाच्या धर्तीवर नगरमध्ये इको बस सुरू करण्याचा विचार आहे. ही बस पर्यटकांना नगर शहर दर्शन घडवून आणील अशी त्यामागील संकल्पना आहे.
मेडिकल टुरिझम ही संकल्पनाही राबविण्यात येणार आहे. शिर्डी, शिंगणापूर येथे येणाऱ्या पर्यटकांना किंवा इतरांना वाजवी दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या तर वैद्यकीय व्यवसाय वाढेल. येथे येणाऱ्यांसाठी राहण्याची सुविधाही चांगली आहे.
- अजय चारठाणकर
उपायुक्त,महानगरपालिका

Web Title: Moving to Destination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.