माता मृत्युचा दर घटला
By Admin | Updated: May 28, 2014 00:14 IST2014-05-27T23:53:51+5:302014-05-28T00:14:13+5:30
ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर राज्याच्या तुलनेत अहमदनगर जिल्ह्यातील माता मृत्युचे दर घटविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.
माता मृत्युचा दर घटला
ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर राज्याच्या तुलनेत अहमदनगर जिल्ह्यातील माता मृत्युचे दर घटविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. ग्रामीण भागात निर्माण झालेल्या आरोग्य सुविधा, दळणवळणाची साधणे, आरोग्य संस्थांमध्ये वाढलेले प्रसूतीचे प्रमाण हे याला कारणीभूत आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत पातळीवर स्त्रियांच्या आरोग्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. किशोरवयीन मुलींपासून, गरोदर माता, प्रसूती झालेल्या माता यांच्यासाठी सरकारकडून विविध योजना राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागासोबत जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभाग आणि राज्य सरकारचा आरोग्य विभाग खांद्याला खांदा लावून स्त्री आरोग्यासाठी काम करतांना दिसत आहे. ग्रामीण पातळीवर अंगणवाडी सेविकेपासून आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका यांच्या माध्यमातून महिला आरोग्याबाबत केवळ जनजागृतीच नव्हे, तर प्रत्यक्ष उपाययोजना करण्यात येत आहेत. यात महिलांना आरोग्य तपासणीसाठी प्रवृत्त करणे, त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबीनची तपासणी करणे, कमी हिमोग्लोबीन असणार्या महिलांना नियमित लोह युक्त गोळ्या देणे आदी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात ८० हजार १७३ गरोदर माता आहेत. मार्चअखेर ६४ हजार ६७६ महिलांची आरोग्य संस्थांमध्ये प्रसूती झालेली असून त्याची टक्केवारी ९६ टक्के आहे. जननी सुरक्षा योजनेत १४ हजार ७६८ महिलांना लाभ देण्यात आला असून गेल्यावर्षी अवघ्या ३५ मातांचा मृत्यू झालेला आहे. राज्याचे मातामृत्युचे प्रमाण दर लाखांमागे १०४ असून जिल्ह्याचे प्रमाण अवघे ५८ आहे. जिल्ह्यात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून गरोदरपणात महिलांची काळजी घेणे, साक्षरतेचे वाढलेले प्रमाण, दळणवळणाची साधने ही त्यामागील कारणे आहेत. गत महिन्यात आरोग्य आणि महिला बालकल्याण विभागाच्या सर्व्हेक्षणात ९६ हजार किशोरवयीन मुली आणि मातांचे हिमोग्लोबीन ११ मिली ग्रामपेक्षा कमी आढळले होते. यासर्वांसाठी महिला बाल कल्याण विभागाच्यावतीने विशेष योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली. मार्चअखेर जिल्ह्यात महिला कुटुंब कल्याण कार्यक्रमात ९४. १२ टक्के काम झालेले आहे. यात एका अपत्यावर शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण उद्दिष्टाच्या १०३ टक्के आहे. १४ हजार ७०८ मातांनी एका अपत्यावर शस्त्रक्रिया केलेली आहे. दोन अपत्यावर शस्त्रक्रिया करणार्यांची टक्केवारी ८२ टक्के असून त्यांची संख्या २३ हजार ९१४ आहे. कमी हिमोग्लोबीन असणार्या महिलांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने लोहाच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. या गोळ्यांच्या माध्यमातून महिलांचे हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. आरोग्य विभाग सरकारकडून येणार्या विविध योजना राबवित आहे. ग्रामीण भागात अधिकाधिक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याचाच परिणाम आता दिसत असून, जिल्ह्यात माता मृत्यू, बाल मृत्युचे प्रमाण कमी होत आहे. - डॉ. संदीप सांगळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी