मोदींचे अण्णांना निमंत्रण नाही

By Admin | Updated: May 24, 2014 00:41 IST2014-05-24T00:05:47+5:302014-05-24T00:41:19+5:30

सुधीर लंके, अहमदनगर ‘सार्क’ देशांच्या प्रमुखांसह एकूण तीन हजार मान्यवरांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

Modi is not invited to Anna | मोदींचे अण्णांना निमंत्रण नाही

मोदींचे अण्णांना निमंत्रण नाही

सुधीर लंके, अहमदनगर ‘सार्क’ देशांच्या प्रमुखांसह एकूण तीन हजार मान्यवरांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पण या मान्यवरांच्या यादीत अण्णा हजारे यांचा मात्र मोदींनी समावेश केलेला दिसत नाही. कारण आज सायंकाळपर्यंत अण्णांना या सोहळ्याचे निमंत्रण मिळालेले नाही. नरेंद्र मोदी २६ मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी देशविदेशातील मान्यवरांना निमंत्रणे गेली आहेत. शांती व भाईचारा वाढविण्याच्या उद्देशाने आपली पूर्वीची आक्रमक भूमिका मवाळ करत मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ, श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्रा राजेपक्षे यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित केले आहे. या दोन निमंत्रणांवरुन वादविवादही सुरु झाले आहेत. देशातून गानसम्राज्ञी लता मंगेशकर,अमिताभ बच्चन, सलमान खान, रजनीकांत यांसारख्या अनेक मान्यवरांना सोहळ्याचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे. पण या सर्व यादीत गांधीवादी नेते अण्णा हजारे यांचा मात्र समावेश दिसत नाही. हजारे यांनी २०११ साली राजधानी दिल्लीसह देशभर भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारला जनलोकपाल कायदा मंजूर करण्याचे धोरण घ्यावे लागले. या कायद्यासाठी संसदेवर विशेष अधिवेशन बोलविण्याची वेळ आली. अण्णांच्या या अहिंसक आंदोलनाची त्यावेळी जगभर दखल घेतली गेली. अनेक देशांनी त्यांना सन्मानाने निमंत्रित केले. अण्णांच्या आंदोलनातून देशभर भ्रष्टाचाराविरोधात जी लाट तयार झाली त्या लाटेवर स्वार होऊनच मोदींनी दिल्ली काबीज केली असेही मानले जाते. मात्र जगभरातील मान्यवरांना निमंत्रित करताना मोदी सरकारला अण्णांचा विसर पडला याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. अण्णांना केंद्र सरकारने पद्मश्री व पद्मभूषण किताब देऊनही गौरविलेले आहे. त्यामुळेही अण्णांना निमंत्रण येणे अपेक्षित होते. पण अद्याप असे निमंत्रण आलेले नाही. अण्णांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता अद्यापपर्यंत या सोहळ्याचे निमंत्रण आलेले नसल्याचे त्यांचे स्वीय सहाय्यक दत्ता आवारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याबाबत अण्णांची प्रतिक्रिया समजू शकली नाही. अण्णा हे ‘असली आझादी’ अभियानासाठी शनिवारी बंगलोरला जात आहेत. त्यांचा नियोजित दौरा ठरला असल्यामुळे आता निमंत्रण मिळाले तरी ते सोहळ्याला ऐनवेळी जाणार की नाही? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Modi is not invited to Anna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.