मिरजगावचा पाणी पुरवठा विस्कळीत! सीना धरणाने गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 18:21 IST2019-06-19T18:21:31+5:302019-06-19T18:21:43+5:30
सीना धरणातील पाणीसाठा खालावल्याने मिरजगाव शहराचा पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे.

मिरजगावचा पाणी पुरवठा विस्कळीत! सीना धरणाने गाठला तळ
मिरजगाव : सीना धरणातील पाणीसाठा खालावल्याने मिरजगाव शहराचा पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ लागल्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सरसावले आहेत.
सीना धरणात मिरजगाव पाणीपुरवठा योजनेच्या दोन विहिरी आहेत. या विहिरींमधून दोन महिन्यापासून पाच दिवसांनी टप्प्या-टप्प्याने चार भागात पाणीपुरवठा केला जातो. दोन आठवड्यांपासून धरणात पाणीसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे विहिरीतील पंपाना पाणी कमी पडू लागले. त्यामुळे गावातील पाणी एका भागाला दहा दिवसांनी पाणी पुरवठा होतो. त्यामुळे ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली.
सोमवारी सकाळी सरपंच नितीन खेतमाळस, दत्ता तनपुरे तर दुपारी उपसरपंच अमृत लिंगडे पंचायत समितीचे सभापती प्रशांत बुद्धिवंत, माजी सरपंच डॉ. आदिनाथ चेडे व ग्रामविकास अधिकारी प्रताप साबळे यांनी धरण परिसरात पाहणी केली. दोन विहिरीतून दहा अश्वशक्ती पंपाच्या सहाय्याने पाणी पाईपलाईनद्वारे पंपहाऊसमध्ये टाकण्याचा निर्णय घेऊन प्रत्यक्षात काम सुरू केले. मंगळवारी माजी पंचायत समिती सदस्य डॉ. पंढरीनाथ गोरे, बाजार समितीचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य संपत बावडकर, लहू वतारे, माजी सरपंच सारंग घोडेस्वार, निवृत्ती जवणे यांनी या कामाची पाहणी करून येथील कामगारांना मदत केली. दोन-तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कल्याण वाकळे, जालिंदर गायकवाड, एकनाथ खोटे, दिगांबर नवले, अशोक रायकर, सोपान राऊत, शिवाजी गायकवाड, मुख्तार सय्यद, विठ्ठल जोगी हे ग्रामपंचायत कर्मचारी आठ दिवसांपासून सातत्याने काम करत आहे.