एमआयडीसीला दररोज १७ एमएलटी पाणी

By Admin | Updated: June 17, 2014 00:36 IST2014-06-16T23:54:25+5:302014-06-17T00:36:38+5:30

अहमदनगर : औद्योगिक वसाहतीतील उद्योगांसाठी दररोज १७ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़ औद्योगिक विकास महामंडळाकडून पुरविले जाणारे पाणी पुरेसे नाही़

MIDC receives 17 mlt of water daily | एमआयडीसीला दररोज १७ एमएलटी पाणी

एमआयडीसीला दररोज १७ एमएलटी पाणी

अहमदनगर : औद्योगिक वसाहतीतील उद्योगांसाठी दररोज १७ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़ औद्योगिक विकास महामंडळाकडून पुरविले जाणारे पाणी पुरेसे नाही़ पाणी पुरत नसल्याने पाणीपुरवठ्यात वाढ करण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे़ परंतु जुनाट जलवाहिनीमुळे पुरेसे पाणी पुरविण्याचे मोठे आव्हान औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमोर आहे़
नागापूर औद्योगिक वसाहतीला मुळा धरणातून पाणीपुरवठा केला जातो़ उद्योगांसाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आली आहे़ जलवाहिनी टाकताना परिसरातील गावांना पाणीपुरवठा करणे महामंडळावर बंधनकारक करण्यात आले आहे़ त्यामुळे परिसरातील नवनागापूर, इसळक, निंबळक, खारे-खर्जूने, वडगाव गुप्ता ग्रामंपचायतींना याच जलवाहिनीतून पाणीपुरवठा होतो़ या गावांना जवळपास २ दशलक्ष लीटर पाणी लागते़ याशिवाय सुपा एमआयडीसीलाही पाणीपुरवठा केला जातो़ त्यामुळे उद्योजकांसह परिसरातील ग्रामस्थही पिण्याच्या पाण्यासाठी या जलवाहिनीवर अवलंबून आहेत़ परंतु जलवाहिनी जुनाट झाल्यामुळे गळती लागण्याचे प्रकार वाढले असून, पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे़
नागापूर औद्योगिक वसाहतीत एक हजार ३५० नळजोड आहेत़ या नळांना चोवीसतास मीटरव्दारे पाणी दिले जाते़ उद्योजकांनी स्वखर्चाने मीटर बसवून घेतले आहे़ उद्योजकांना एक हजार लीटर पाण्यासाठी २५ रुपयांची पाणीपट्टी भरावी लागते़ मात्र पाणीपुरवठा सुरळीत नाही़ त्यामुळे पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे़
पाणीपट्टी भरूनही पाणी मिळत नसल्याने उद्योजकांत नाराजी पसरली आहे़ महामंडळाने नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम ठेकेदारास दिले होते़ परंतु परिसरातील शेतकऱ्यांकडून काम बंद पाडण्यात आले़ त्यामुळे जलवाहिनीचे काम रखडले असून, त्यास अद्यापही मुहूर्त सापडलेला
नाही़ (प्रतिनिधी)
वादळी वाऱ्यासह पावसामुळे पडझड होऊन विद्युतपुरवठा खंडीत झाला़ तो सुरळीत झाला आणि पुन्हा जलवाहिनी फुटली़ ती दुरुस्त करण्यात आली असून, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़
- वि़ प़ खांदवे, पाणीपुरवठा विभागप्रमुख,एमआयडीसी
काही भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे़ मात्र काही भागात पाणीपुरवठा होत नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत़ कामगारांना पिण्यासाठी पाणी नाही़ त्यामुळे टँकरचे पाणी घ्यावे लागते़
- राजेंद्र कटारिया, उद्योजक

Web Title: MIDC receives 17 mlt of water daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.