दोनशे गावांना मीटरने पाणी
By Admin | Updated: July 25, 2014 00:26 IST2014-07-25T00:18:15+5:302014-07-25T00:26:42+5:30
अहमदनगर पाणी पुरवठा योजनेमार्फत चालविण्यात येणाऱ्या ३६ नळ पाणी पुरवठा योजनेतील २०६ गावांना मीटरने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या जलव्यस्थापन समितीच्या बैठकीत झाला

दोनशे गावांना मीटरने पाणी
अहमदनगर : जिल्हा परिषद संयुक्त पाणी पुरवठा योजनेमार्फत चालविण्यात येणाऱ्या ३६ नळ पाणी पुरवठा योजनेतील २०६ गावांना मीटरने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या जलव्यस्थापन समितीच्या बैठकीत झाला. जिल्हा नियोजन विकास निधीतून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून यासाठी १ कोटी ६ लाख रुपयांचा निधीची मागणी नोंदविण्यात आली आहे. शंभर टक्के नळ जोडणी यंत्र बसविणाऱ्या ग्रामपंचायतींना सौर ऊर्जेची जोड मिळणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या अध्यक्षेतखाली गुरूवारी जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन समितीची बैठक झाली. यात भविष्यात प्रादेशिक पाणी योजना, नळ पाणी योजना आणि स्वतंत्र पाणी योजनांचे पाणी मीटरव्दारे मोजून देण्याबाबत चर्चा झाली. जिल्हा परिषदेच्या संयुक्त पाणी पुरवठा योजनेमार्फत ३६ नळ पाणी पुरवठा योजना चालविण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात या योजनेत समाविष्ट असणाऱ्या गावांना मीटरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यासाठी जिल्हा नियोजनमधून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून १ कोटी ६ लाख रुपयांची मागणी पालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्याकडे करण्यात आलेली आहे. शंभर टक्के नळ जोडणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना पाण्याचा पंप चालविण्यासाठी सौर ऊर्जेचा जोड देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातून एका गावाची निवड करण्यात येणार आहे. या योजनेसाठी १ कोटी ६८ लाख रुपयांची मागणी करण्यात येणार आहे.
शेवगाव-पाथर्डी या तालुक्यातील ५८ गावाचा तालुका घटक धरून व पाथर्डी शहर आणि शेवगाव शहर वगळून अन्य गावांसाठी स्वतंत्र पाणी योजना मंजूर करण्यासाठी सर्वेक्षण आणि अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाथर्डी शहरात नगरपालिका असून शेवगावमध्ये प्रस्तावित असल्याने या दोघांना यातून वगळण्यात आलेले आहे.
बैठकीला उपाध्यक्ष मोनिका राजळे, सभापती बाबासाहेब तांबे, शाहुराव घुटे, हर्षदा काकडे, सदस्य अॅड. सुभाष पाटील, सुनील गडाख, निमंत्रित सदस्य केशव भवर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप, कार्यकारी अभियंता कदम उपस्थित होते.
(प्रतिनिधी)
खोले यांचा पदभार काढला
१पावसाळ्यात ३६१ टँकरव्दारे दररोज ९५६ खेपाव्दारे २७९ वाड्या आणि १ हजार ३३२ गावातील जनतेची तहान भागविण्यात येत आहे. भर पावसाळ्यात सहा लाख आठ हजार जनतेला सरकारी पाण्यावर अवलंबून राहवे लागत आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला संभाव्य पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.
२शेवगाव-पाथर्डी पाणी योजनेचे वादग्रस्त शाखा अभियंता बबन खोले यांची चौकशी करून त्यांच्याकडून पाणी योजनेचे कामकाज काढून घेण्याचा निर्णय सुमारे महिनाभरापूर्वी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, त्यावर कार्यवाही झालेली नव्हती. गुरूवारच्या बैठकीत सभापती काकडे यांनी याप्रकरणी नाराजी व्यक्त करत, प्रशासनावर टीका केली. त्यामुळे तातडीने खोले यांचा कार्यभार काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
३राज्य शासनाने पाणी पुरवठा योजनांसाठी असणारी दहा टक्के लोकवर्गणीची अट शासनाने रद्द केली आहे. याच निर्णयाप्रमाणे जिल्हा परिषदेच्या देखभाल दुरूस्तीच्या योजनांना दहा टक्के वर्गणीची अट देखील लागू राहणार नसल्याचे अध्यक्ष लंघे यांनी सांगितले.