बाजार समित्या कडकडीत बंद

By Admin | Updated: July 4, 2016 23:51 IST2016-07-04T23:44:47+5:302016-07-04T23:51:36+5:30

अहमदनगर : शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमनातून वगळण्याच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी सोमवारी कडकडीत बंद पुकारला़

Market committees shut down | बाजार समित्या कडकडीत बंद

बाजार समित्या कडकडीत बंद


अहमदनगर : शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमनातून वगळण्याच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी सोमवारी कडकडीत बंद पुकारला़ दरम्यान हमालांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून संताप व्यक्त केला़ त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज दिवसभर ठप्प होते़ सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन हाती घेण्याचा इशारा हमाल व व्यापारी असोसिएशनने दिला आहे़
कृषी उत्पन्न बाजार समिती नियमनातून फळे, भाजीपाला, कांदा बटाटे आदी शेतमाल वगळण्याचा निर्णय युती सरकारने घेतला आहे़ सरकारच्या या निर्णयाचे पडसाद सोमवारी नगरमध्ये उमटले़ नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याचा नियमित लिलाव होत असतो़ हा लिलाव सोमवारी झाला नाही़ दुकाने बंद ठेवून नगर व नेप्ती येथील व्यापाऱ्यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला़ दरम्यान जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांच्या नेतृत्वाखाली दुपारी बारा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला़ कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल पंचायत भवन येथून हा मोर्चा निघाला होता़
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले़ सुमारे दोनशेहून अधिक हमाल मोर्चात सहभागी होते़ सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता़ या धोरणावर घुले यांच्यासह सर्वांनी यावेळी सडकून टीका केली़
जिल्हाभरातून शेतकरी माल विक्रीसाठी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाले होते़ मात्र व्यापाऱ्यांची दुकाने बंद होती़ त्यामुळे माल परत घरी घेवून जाणे शेतकऱ्यांना शक्य नव्हते़
बाजार समितीच्या बाहेर काहींनी पथारी टाकून भाजीपाल्याची विक्री केली़
आघाडी सरकारच्या काळातही हा निर्णय झाला होता़ मात्र हमाल व व्यापाऱ्यांनी त्यास विरोध केला़ त्यामुळे हा निर्णय सरकारने मागे घेतला़ पण, युती सरकारने पुन्हा याबाबत आदेश जारी केला आहे़ त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील हजारो हमालांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे़ सरकारने उत्पादन आधारित शेतीमालाला भाव जाहीर करावा़पण, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमनातून भाजीपाल्यासह आदी शेतमाल वगळू नये़ तसे झाल्यास बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात येईल़
परिणामी शेतकऱ्यांना त्यांचा माल कवडीमोल भावात विकावा लागेल़ त्याचबरोबर ही संपूर्ण व्यवस्था नष्ट होऊन अनेक प्रश्न निर्माण होतील़ सरकारने हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी निवेदनाव्दारे करण्यात आली़ नगरसह जिल्ह्यातील बाजार समित्या दिवसभर बंद होत्या़
(प्रतिनिधी)
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्यासह शेतमालाचे लिलाव करणारी १२५ दुकाने आहेत़ या दुकानांत दररोज अंदाजे एक ते दीड कोटींची उलाढाल होती़ बंदमुळे ही उलाढाल झाली नाही़ त्याचबरोबर नेप्ती येथील बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होते़ तिथे अंदाजे सहा ते सात कोटींची उलाढाल होत असते़ नेप्ती येथील बाजार समितीदेखील बंद होती़
सरकारने हा चुकीचा निर्णय घेतला आहे़ त्यामुळे हमालांवर उपासमारीची वेळ येणार असून, सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव जाहीर करावा़ पण, हा निर्णय घेऊ नये, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन हमाल पंचायतीच्या वतीने हाती घेण्यात येणार आहे़
-अविनाश घुले,
अध्यक्ष, जिल्हा हमाल पंचायत
व्यापारी ५ ते ६ रुपये आडत घेतो़ पण, त्याबदल्यात शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळतो़ परंतु, सरकारने ही आडत बंद करावी, यासाठी हा आटापिटा चालविला आहे़ सरकारला शेतकऱ्यांची एवढीच काळजी असेल, तर खते व बियाणे सवलतीच्या दरात द्यावीत़ सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्या उदध्वस्त करण्याचा कुटील डाव आखला असून, त्याविरोधात बेमुदत बंद पुकारण्यात येणार आहे़
-संतोष सूर्यवंशी,
अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन

Web Title: Market committees shut down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.