माळीणच्या उदरात आजोळ हरवलं
By Admin | Updated: August 10, 2014 23:28 IST2014-08-10T23:18:21+5:302014-08-10T23:28:07+5:30
शिर्डी : निसर्गाची मुक्त उधळण करीत असलेलं देखणं गाव माळीण, निसर्गाने आपल्या कवेत घेऊन क्षणात होत्याच नव्हतं करून टाकलं़

माळीणच्या उदरात आजोळ हरवलं
शिर्डी : निसर्गाची मुक्त उधळण करीत असलेलं देखणं गाव माळीण, निसर्गाने आपल्या कवेत घेऊन क्षणात होत्याच नव्हतं करून टाकलं़ या दुर्घटनेत १५२ नागरिक काळाच्या उदरात गडप झाले़ याबरोबरच अनेक नातीही थिजून गेली़ राजू शिंगाडे या तरुणाचे आजोळही या घटनेत हरवून गेल़ं
राजू शिंगाडे हा तरुण शिर्डी नगरपंचायतमध्ये संगणक अभियंता आहे़ अगदी लहानपणापासून आजोळाशी जोडलेल्या आठवणींचं भेडोंळे उलगडतांना राजूचे अश्रूही सुकून गेलेत़ त्याने या दुर्घटनेत आजी, मामाचा मुलगा व चुलत मामाच्या कुटुंबासह नऊ जणांना गमावलं आहे़ त्याचं गाव वचपे. माळीण या आजोळच्या गावापासून अवघ्या तीन-चार किलोमीटर अंतरावर डिंबे धरणाच्या कडेवर बसलेलं़ माळीणमध्ये त्याची वृद्ध आजी व चुलत मामांचे कुटुंब राहत होते़ त्या कुटुंबातील अन्यजन पुण्यात स्थायिक झाले आहेत. सणासुदीला किंवा शेतीच्या कामाला घरी येणं होई़ घटनेच्या दोनच दिवस अगोदर मामाचा पदवीधर असलेला मुलगा जितेंद्र लेंभे हा पुण्यावरून भात आवणीच्या कामाला आला होता़ तो नेहमी मारुती मंदिरात झोपायला असे़ दिवसभरच्या कामानंतर घटनेच्या दिवशी मात्र तो घरीच झोपला होता़ चुलत मामा दुंडाजी लेंभे शेतावर गेल्याने वाचले़आजी बबाबाई व चुलत मामाच्या सहा मुली, मुलगा काळाने हिरावून नेले़
राजूची आजी डोंगराच्या वरच्या बाजूला असलेल्या पहिल्या आळीत एका कौलारू घरात राहत होती़ प्रथम हीच आळी दरडीखाली गडप झाली़ पावसाळ्यात या गावाचं देखणेपणं खुलून येई, येथे झालेली मामांच्या मुलींची लग्ने,सणासुदीला जाणं-येणं, दिवाळी, उन्हाळी सुट्टयातील वास्तव्य, आंबे, करवंदे गोळा करणे, ओेढ्यावर आंघोळीला जाणे, या आठवणीं संपता संपत नाहीत़ विशेष म्हणजे जितेंद्र राजूचा समवयस्क असल्याने राजू गावी असेल तेव्हा आजोळीच राही़
तेथील आठवणी, आनंदाने व्यतित केलेले क्षण आता केवळ इतिहासजमा झालेत, उरल्या केवळ हृदयाला पीळ पाडणाऱ्या आठवणी़
(प्रतिनिधी)