अधीक्षक कार्यालयावर लोहार समाजाचा मोर्चा
By Admin | Updated: July 10, 2016 00:35 IST2016-07-10T00:31:05+5:302016-07-10T00:35:48+5:30
अहमदनगर : नेवासा तालुक्यातील महेंद्र आगळे खून प्रकरणाचा तपास सीआयडी अथवा स्थानिक गुन्हे शाखा विभागाकडे वर्ग करावा,

अधीक्षक कार्यालयावर लोहार समाजाचा मोर्चा
अहमदनगर : नेवासा तालुक्यातील महेंद्र आगळे खून प्रकरणाचा तपास सीआयडी अथवा स्थानिक गुन्हे शाखा विभागाकडे वर्ग करावा, या मागणीसाठी लोहार समाज व लोहार यूथ फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर शनिवारी मूक मोर्चा काढण्यात आला.
नगर- औरंगाबाद महामार्गावरील पावन गणपती मंदिराच्या सभागृहात लोहार समाजाची बैठक झाली. बैठकीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मूक मोर्चा नेण्यात आला. या मोर्चात हर्षल आगळे, दीपक सोनवणे, किशोर सोनवणे, हरीभाऊ हारेर, अशोक दाताळ, मिलिंद सोनवणे, सुधाकर हारेर, अशोक पोपळघट, दशरथ पोपळघट, संजय थोरात, विवेक नन्नवरे, संतोष हारेर, भरत हारेर, शंकर सोनवणे, अजय खंडागळे, बाळासाहेब पोपळघट आदी सहभागी झाले होते़
याबाबत अपर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नेवासा येथील लोहार समाजाचे मच्छिंद्र आगळे हे आपल्या विवाहित मुलगा महेंद्र आगळे यांच्यासह एकत्रित कुटुंबासह ज्ञानोदय हायस्कूलजवळ राहतात़ दि. १९ जून रोजी मच्छिंद्र यांचा मुलगा महेंद्रचा खून झाला. लाजरस देठे व त्यांचे कुटुंबीयांनी आगळे यांच्या घरी येऊन तुमच्या मुलाला संपवणार असल्याचे धमकावून गेले होते. आगळे कुटुंबीयांनी मयत महेंद्रचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो आढळून आला नाही. त्यानंतर महेंद्र हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला़ याबाबत चाौकशीसाठी पोलीस देठे यांच्या घरी गेले असता, तेथे कोणीही आढळून आले नाही. ते अटकेच्या भितीने फरार झाले व अटकपूर्व जामीन करवून घेतला. पोलिसांनी आरोपी लाजरस देठे यांचा जामीन होताना, त्याची गुन्हेगारी प्रवृत्तीची माहिती घेणे आवश्यक होती. देठे परिवारानेच संगनमत करुन आपली गुन्हेगारी दहशत ठेवण्यासाठी महेंद्र आगळे यांचा गळा दाबून खून करुन, त्याला आत्महत्येचे स्वरुप देण्याचा प्रयत्न केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडी अथवा एलसीबी विभागाकडे वर्ग करावा. आगळे कुटुंबीयांना पोलीस संरक्षण मिळावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या़ (प्रतिनिधी)