अहमदनगर जिल्ह्यातील पानमळे झाले नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:22 IST2021-05-27T04:22:03+5:302021-05-27T04:22:03+5:30

‘खईके पान बनारस वाला, खुल जाये बंद अकल का ताला’ या डॉन चित्रपटातील गाण्याने नागवेलींच्या पानांची महती देशभरात पोहोचवली. ...

The leaves in Ahmednagar district became extinct | अहमदनगर जिल्ह्यातील पानमळे झाले नामशेष

अहमदनगर जिल्ह्यातील पानमळे झाले नामशेष

‘खईके पान बनारस वाला, खुल जाये बंद अकल का ताला’ या डॉन चित्रपटातील गाण्याने नागवेलींच्या पानांची महती देशभरात पोहोचवली. ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’ या बहारदार लावणीने त्यात आणखीच रंगत आणली. मराठी, हिंदी चित्रपटातील गाण्यांतून आणि लावण्यांमधून नागवेलींच्या पानात अक्षरशः गोडवा आणला. पण अगदी पुरातन काळापासून महत्त्व असलेल्या नागवेलींच्या पानाचे मळे आज घडीला सरकार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेवटच्या घटका मोजताहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नागवेलींच्या पानाचे मळे तर अक्षरशः नामशेष झाले आहेत. जिल्ह्यातील संगमनेर, राहाता, श्रीरामपूर तालुक्यात १९९९-२००० सालापर्यंत पानाचे शेकडो पानमळे अस्तित्वात होते. पण वातावरणात बदल झाला. पावसाचे प्रमाण कमी झाले. गारपिटीचा फटका बसू लागला आणि अशा परिस्थितीत सरकार आणि प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने आजघडीला एखाद्या गावात क्वचितच एक-दोन पानमळे शिल्लक राहिले आहेत.

.............

नागवेलीच्या पानाचा मळा उभा करण्यासाठी अथक कष्ट घ्यावे लागतात. वेलींची लागवड करण्याआधी उंच वाढणाऱ्या शेवगा झाडाची लागवड करावी लागते. नंतर पानाच्या वेली लावाव्या लागतात. नंतर नागवेल या झाडांवर चढविली जाते. कमी पाण्यात वेली वाढण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर हमखास करावा लागतो. तारेच्या कंपाऊंड बरोबरच पानवेलींना वादळाचा फटका बसू नये म्हणून जाळ्यादेखील लावाव्या लागतात. अगदी पहिले उत्पन्न हातात येईपर्यंत लाखोंचा खर्च होतो.

.,......

पान खाल्ल्याने शरीराला आवश्यक असणारी कॅल्शियम, प्रोटीन्स, खनिजे, कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटॅमिन सी मिळते. अनेकदा पान खाणे ही वाईट सवय समजली जाते. कारण अनेक लोक व्यसन म्हणून पान खातात. त्यामध्ये शरीराला हानिकारक अशा पदार्थांचा समावेश करण्यात येतो. असे केल्याने पानामधील शरीराला आवश्यक असणारी सर्व तत्त्वे नष्ट होतात. त्यामुळे असे न करता त्यामध्ये शरीराला आवश्यक असणाऱ्या पदार्थांचा समावेश करून पान खाणे फायदेशीर ठरते. पान खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी, दातांमध्ये लागलेली कीड, भूक वाढणे त्याचप्रमाणे पचन क्रियादेखील सुरळीत होण्यास मदत होते.

- डॉ. प्रणय रघुवंशी, सहाय्यक प्राध्यापक, प्रवरा मेडिकल ट्रस्ट.

......................

अहमदनगर जिल्ह्यासाठी २५० डप्पा (पाट्या) नागवेलींची पाने लागतात. तीन हजार पानांचा एक डप्पा असतो. एका डप्प्याची किंमत तीनशे रुपयांपासून ते २५०० रुपयांपर्यत असते. कोरोना लाॅकडाऊनपूर्वी जिल्ह्यात दररोज ५०० ते ६०० डप्पे लागत होते. सध्या लाॅकडाऊन सुरू असल्याने श्रीरामपूर येथील नागवेलींच्या पानांचा लिलाव बंद आहे.

-बी. डी. थोरात, पानांचे होलसेल विक्रेते, शिर्डी.

Web Title: The leaves in Ahmednagar district became extinct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.