ट्रक अपघातानंतर दारूची लयलुट : चिखलीजवळील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 18:20 IST2019-02-28T18:19:47+5:302019-02-28T18:20:29+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील चिखलीजवळ अहमदनगर-दौंड महामार्गावर ट्रकला अपघात झाल्यानंतर त्यातील दारूची उपस्थित बघ्यांनी मदत करण्याऐवजी दारूची लयलुट केली.

ट्रक अपघातानंतर दारूची लयलुट : चिखलीजवळील घटना
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील चिखलीजवळ अहमदनगर-दौंड महामार्गावर ट्रकला अपघात झाल्यानंतर त्यातील दारूची उपस्थित बघ्यांनी मदत करण्याऐवजी दारूची लयलुट केली.
बारामतीहून औरंगाबादकडे हा ट्रक (क्रमांक आर. जे. ०२/जी ओ ०२९१) दारूच्या बाटल्यांनी भरलेले खोके घेऊन निघाला होता. बुधवारी दुपारी सव्वा चार वाजता तो चिखलीजवळ उलटला. दारूच्या ट्रकला अपघात होऊन उलटल्याची माहिती समजताच परिसरातून अनेक बघ्यांनी अपघातस्थळी गर्दी केली. त्यातील अनेकांनी अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी त्यातील दारूचे खोक्यांची लयलुटी करण्यासाठी घाई केली.
याचवेळी अहमदनगर येथील ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ कार्यक्रमाहून परतणारे लोकमतचे विसापूर येथील वार्ताहर नानासाहेब जठार यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यास अपघाताची माहिती दिली. दरम्यान काही स्थानिक युवकांनी चालकाला आधार दिल्यानंतर दारूची लुट काही काळ थांबली. थांबली. मात्र पोलीस बेलवंडीहून घटनास्थळी पोहोचेपर्यंत अनेकांनी ट्रक चालकाच्या विनवणीला न जुमानता दारूचे खोके पळविले. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी कोळगाव येथील द्राक्षाचा एक ट्रक उलटला होता. त्या ट्रकमधील द्राक्षाचे कॅरेट लोकांनी पळविले होते.