कोतकरचा जामीन अर्ज फेटाळला
By Admin | Updated: May 22, 2014 00:01 IST2014-05-21T23:42:51+5:302014-05-22T00:01:04+5:30
अहमदनगर : शेवगाव येथील लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणातील मुख्य आरोपी भानुदास कोतकर याने केलेला जामीन अर्ज नाशिक येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर. कदम यांनी फेटाळला आहे.

कोतकरचा जामीन अर्ज फेटाळला
अहमदनगर : शेवगाव येथील लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणातील मुख्य आरोपी भानुदास कोतकर याने केलेला जामीन अर्ज नाशिक येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर. कदम यांनी फेटाळला आहे. दरम्यान हा खटला नगर येथून वर्ग झाला असून त्याची पुढील सुनावणी २९ मे रोजी होणार आहे. लांडे खून प्रकरणातील खटला हा मीडिया ट्रायल असल्याचे कारण सांगून हा खटला अन्य जिल्ह्यात वर्ग करण्याची याचिका आरोपींनी केली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा खटला नाशिकला वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपी भानुदास कोतकर याने २१ मार्च २०१४ रोजी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर नाशिक न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणातील मूळ फिर्यादी शंकर राऊत यांनी कोतकरचे यापूर्वी बारा वेळा जामीन फेटाळण्यात आले आहेत. कोतकरला गुन्हेगारी आणि राजकीय पार्श्वभूमी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यापूर्वी कोणत्या कारणामुळे कोतकरचा जामीन फेटाळण्यात आला, त्याचे निकालपत्रही राऊत यांनी न्यायालयाला सादर केले. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील एस.पी. माने यांनी काम पाहिले. आरोपीतर्फे अॅड. अविनाश भिडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी) वक्तव्य भोवले महापालिका निवडणुकीच्या काळात राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केडगाव येथील सभेतील भाषणात काँग्रेस पक्ष व राज्य सरकार कोतकर यांच्या पाठिशी असल्याचे वक्तव्य केले होते. याबाबतची कात्रणेही राऊत यांनी न्यायालयाला सादर केली. त्यामुळे लांडे खून प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी ही पॉलिटिकल ट्रायल झाल्याचे राऊत यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे कोतकरला कोणत्याही प्रकारे जामीन मंजूर करू नये, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली. विखे यांचे वक्तव्य लांडे खून प्रकरणात चांगलेच अडचणीचे ठरले आहे. कोतकर सबजेलमध्येच लांडे खून प्रकरणाचा खटला नाशिकला वर्ग झाला तरी आरोपी भानुदास कोतकर सध्या नगरच्या उपकारागृहात आहे. त्यामुळे नाशिक येथे सुनावणीसाठी त्याला खास वाहनामार्फत नाशिकला नेले जाते. आरोपीवर एवढा खर्च कशासाठी असा आक्षेप घेत कोतकरला नाशिकच्या कारागृहात हलवावे, अशी मागणी केली आहे. याबाबत राऊत यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील, तुरुंग महानिरीक्षक मीरा बोरवणकर, पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांना निवेदन दिले आहे. मात्र या तक्रारीची कोणतीही दखल प्रशासनाने घेतली नसल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. उपकारागृहाचे अधीक्षक ज्ञानेश्वर काळे आणि भानुदास कोतकर हे नातेवाईक असल्याने कोतकरचे उपकारागृहात पुरविले जाणारे लाड नाशिकला होणार नाहीत, ही भीती प्रशासनाला असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.