ही खेळी कर्डिले-गांधींची, की भाजपाची?
By Admin | Updated: June 17, 2016 23:33 IST2016-06-17T23:21:20+5:302016-06-17T23:33:57+5:30
विश्लेषण- सुधीर लंके अहमदनगर : नगर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपात फूट पडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पक्षातील ही गटबाजी स्वाभाविक आहे की ही पक्षाचीच फूस? याबाबत साशंकता आहे.

ही खेळी कर्डिले-गांधींची, की भाजपाची?
विश्लेषण- सुधीर लंके
अहमदनगर : नगर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपात फूट पडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पक्षातील ही गटबाजी स्वाभाविक आहे की ही पक्षाचीच फूस? याबाबत साशंकता आहे. खासदार दिलीप गांधी व आमदार शिवाजी कर्डिले यांनी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन उमेदवार दिला असेल तर त्यांचे हे पाऊलही नव्या राजकारणाची नांदी मानली जाते.
महापालिकेत सेना-भाजपची पारंपरिक युती आहे. ज्यांचे नगरसेवक जास्त त्यांचा महापौर हे या सत्तेचे सूत्र आहे. त्यामुळे महापौर पदासाठी सेनेने तयारी केली. मात्र, यावेळी भाजप एकमुखाने सेनेच्या पाठिशी उभा रहायला तयार नाही. भाजपच्या अभय आगरकर गटातील पाच नगरसेवकांचा ताफा सेनेसोबत, तर खासदार गांधी गटाचे चार नगरसेवक सेनेविरुद्ध, असे चित्र आहे.
अभय आगरकर यांनी विधानसभा निवडणूक आमदार अनिल राठोड यांच्या विरोधात लढविली. परंतु आता त्यांचे पुन्हा सेनेसोबत सूत जुळले. ‘दोन्ही पक्षांची पारंपरिक युती असल्याने आम्ही सेनेसोबत आहोत’, असे त्यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे ही युती धुडकावत खासदार गांधी गटाने सेनेच्या विरोधात उमेदवार दिला. त्यांना आमदार शिवाजी कर्डिले यांचीही साथ आहे, हे उघड गुपित आहे.
खासदार गांधी यांचे आगरकर तसेच सेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्याशी जमत नाही. त्यामुळे या दोघांचेही उट्टे काढण्यासाठी त्यांनी ही खेळी केल्याचे बोलले जाते. गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांना उपमहापौर पदाची उमेदवारी देण्यास आगरकर गटाने विरोध केला. तीही सल गांधी यांच्या मनात होती.
भाजपला दोन्ही कॉंग्रेस जी साथसंगत करत आहे, त्यात आमदार कर्डिले यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे बोलले जाते. कर्डिले यांनी शहरात भाजपला बलवान करण्यासाठी कधी फारसे प्रयत्न केलेले दिसत नाहीत. जगताप-कोतकर यांपैकी कुणी उमेदवार असेल तर कर्डिले हे पक्षापेक्षा ‘सोधा’ पक्ष अधिक जपतात, हे वेळोवेळी दिसले. यावेळी दोन्ही कॉंग्रेसकडून जगताप-कोतकर यांपैकी महापौर पदासाठी कुणीही उमेदवार नाही. सेनेचा महापौर झाल्यास आमदार अनिल राठोड यांचे राजकारण जीवंत होऊन आपले जावई संग्राम जगताप यांच्या राजकारणात पुन्हा काटे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सेना जीवंत होऊ नये, यासाठीच कर्डिले, दादा कळमकर, अरुण जगताप हे सगळे एकत्र आल्याचेही बोलले जाते. त्यांनी भाजपातील दुफळीचा पद्धतशीर वापर करुन घेतला. सेना-भाजपमध्ये भांडणे पेटविण्यात दोन्ही कॉंग्रेसचे नेते यशस्वी झाले.
गांधी-कर्डिले या दोघांनाही पक्षात मंत्रिपद हवे आहे. भाजपचा महापौर करुन पक्षदरबारी आपले वजन वाढविण्याचा गांधी, कर्डिले यांचा इरादा असावा, असाही एक तर्क या राजकारणामागे आहे. आम्हाला जास्त काळ दुर्लक्षित कराल, तर आम्ही काहीही करु शकतो, आम्हाला कॉंग्रेस-राष्ट्रवादी वर्ज्य नाही, त्यामुळे आम्हाला गृहीत धरु नका, असेही त्यांना बहुधा सुचवायचे आहे.
भाजपचे श्रेष्ठी या सर्व घडामोडीत काय भूमिका घेणार ? याबाबत उत्सुकता आहे. भाजपचा महापौर होवो अथवा त्यांनी माघार घेवो, या राजकारणाचा भाजपला शहरात फटका बसेल, अशीच शक्यता आहे. हे राजकारण दोन्ही कॉंग्रेसच्या विशेषत: राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणारे आहे. शहर हितापेक्षा हे राजकारण नेत्यांच्या गटातटाच्या हिताचे दिसते.