भावी वारसदारांसाठी एवढे करायलाच हवे!
By Admin | Updated: May 27, 2016 23:17 IST2016-05-27T23:03:10+5:302016-05-27T23:17:32+5:30
अहमदनगर हे स्थापना दिन साजरा करणारे राज्यातील कदाचित एकमेव शहर असावं! ५२५ वयाचे हे शहर आजही शहरवासीयांकडे आपली ओळख शोधत आहे

भावी वारसदारांसाठी एवढे करायलाच हवे!
अहमदनगर हे स्थापना दिन साजरा करणारे राज्यातील कदाचित एकमेव शहर असावं! ५२५ वयाचे हे शहर आजही शहरवासीयांकडे आपली ओळख शोधत आहे. याला आम्ही नगरकरच कारणीभूत आहोत का? यावर मंथन होणे गरजेचे आहे़ माझ्या वाढदिवसाइतकाच किंबहुना त्यापेक्षाही माझ्या शहराचा वाढदिवस महत्वाचा व्हायला हवा असे एक कलावंत म्हणून मला नेहमी वाटते.
नगर शहराची वेगळी ओळख सांगता येईल असा भुईकोट किल्ला, फराह बक्श महल , हस्त-बेहस्त बाग , चाँदबिबी महाल, हत्ती बारव, अशा ऐतिहासिक वास्तू अस्तित्वात आहेत़ या वास्तू एकमेवाद्वितीय आहेत. जगाच्या पाठीवर कुठेही दुसरी चाँदबिबी झालेली नाही व कुठेही चाँदबिबीचा महाल नाही. सपाट पठारावर अभेद्य भुईकोट किल्ला बांधणारा अहमदशहा जगात दुसरा नाही, पण असे असूनही आजही आमच्या या पूर्वजांचा आम्हाला सार्थ अभिमान नाही. हा वारसा जपण्याची, वेगवेगळ्या मार्गाने हा वारसा जगभरात पाठवण्याची तळमळ नाही. या वास्तुंचे जतन, संवर्धन, व प्रसिध्दीसाठी व्यक्तिगत पातळीवर अनेक प्रयत्न होताहेत पण या प्रयत्नांना शासकीय पातळीवरून अपेक्षित प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे़ शहरातील अनेक ऐतिहासिक वास्तुंची डागडुजी होणे गरजेचे आहे तर काही ठिकाणी परिसर सजावटीची गरज आहे. सर्वच वास्तुंची प्रसिध्दीही होणे गरजेचे आहे. या वास्तुंपर्यंत जाण्यासाठी कायमस्वरूपी अथवा ठराविक वारी वाहतूक व्यवस्था असणे आवश्यक आहे. या विविध वास्तुंची माहिती, महत्व सांगणाऱ्या पुस्तिका, मार्गदर्शिका करून द्यायला हव्यात. शासकीय पातळीवर ही बाजू सावरली तरी आपल्या शहराचा अभिमान बाळगणाऱ्या नगरकरांची आपली भूमिका महत्वाचीच आहे.
मराठवाड्यात जाणारे, शिर्डी, शिंगणापूर, राळेगणसिध्दी, हिवरे बाजारकडे मुक्कामी असलेले पर्यटक येथे नक्कीच थांबतील़ आपल्या वारशाबाबत उदासीनता सोडली तरी बरेचसे काम होणार आहे. शहराच्या इतिहासाविषयी, इथल्या परंपरांविषयी आम्ही आत्मीयता बाळगली तर ती इतरांच्या मनात रूजवता येईल. ‘अतिथी देवो भव।’ असे आमची संस्कृती सांगते. अतिथीला थेट देवाचे स्थान दिले आहे त्यामागची भूमिका समजावून आमचे वर्तन हवे. इथे आपुलकी हवी, प्रेम हवे, माणुसकी, सचोटी, आदरातिथ्य हवे. अतिथी पुन्हा पुन्हा यावा वाटत असेल तर या शहराची प्रतिमा डागाळणार नाही़ यासाठी प्रत्येकाचाच प्रयत्न आवश्यक आहे.
एकाने चांगले वागून त्याचा परिणाम होत नाही, कारण चांगल्या गोष्टींपेक्षा वाईटाचा लवकर व सर्वदूर प्रसार होतो. याचे भान यजमानाला असायलाच हवे. या साऱ्यांचा परिपाक म्हणजे शहर विकासाचा वसा शासनाबरोबरच प्रत्येकाने व्यक्तिश: घ्यायला हवा तरच जगाच्या नकाशावर अहमदनगरचे नाव चांगल्या अर्थाने झळकेल, नावारूपाला येईल व पूर्वजांचा वारसा नव्या पिढीने जपला असे होईल.
पुढच्या पिढीसाठी, शहराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नगरकरांनो एवढा संकल्प आजच्या ५२६ व्या स्थापना दिनी करायलाच हवा.
-प्रमोद कांबळे
शिल्पकार