मुख्याधिकार्यांना घातला घेराव
By Admin | Updated: May 27, 2014 00:30 IST2014-05-27T00:17:50+5:302014-05-27T00:30:44+5:30
पाथर्डी : पालिकेचे मुख्याधिकारी एन. व्ही. महानवार सोमवारी पंधरा दिवसानंतर पालिकेत आले असता अंतिम मंजुरीच्या सह्या का करीत नाहीत, बांधकाम परवानगीचे पत्र का देत नाहीत

मुख्याधिकार्यांना घातला घेराव
पाथर्डी : पालिकेचे मुख्याधिकारी एन. व्ही. महानवार सोमवारी पंधरा दिवसानंतर पालिकेत आले असता अंतिम मंजुरीच्या सह्या का करीत नाहीत, बांधकाम परवानगीचे पत्र का देत नाहीत आदी प्रश्नांचा भडिमार करीत संतप्त तरुणांनी मुख्याधिकार्यांना घेरावा घातला. सह्या करणार नसाल तर तसे लेखी द्या, अशी मागणी करताच मुख्याधिकारी कार्यालय सोडून निघून गेले़ त्यानंतर युवकांनी मुख्याधिकार्यांच्या खुर्चीला हार घालत गांधीगिरी केली. पालिकेचे नगराध्यक्ष अभय आव्हाड व सत्ताधारी नगरसेवकांनी दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची भेट घेऊन मुख्याधिकारी पालिकेत दहा-दहा दिवस येत नाहीत़ त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच विकास कामांचे कार्यारंभ देताना लाच मागतात, असे आरोप करीत त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. यामुळे पालिकेत सत्ताधारी विरुद्ध मुख्याधिकारी असा सामना रंगला आहे़ सोमवारी सकाळी मुख्याधिकारी पालिका कार्यालयात आले. त्यानंतर थोड्याच वेळात सोमनाथ बोरुडे, ज्ञानेश्वर कोकाटे, अक्षय काळे, राजू बोरुडे, बाळासाहेब बोरुडे आदी सुमारे २०-२५ युवकांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन मुख्याधिकार्यांना घेराव घातला़ मारुती मंदिर रस्त्यावर स्ट्रीट लाईटची निविदा काढण्यास विलंब का लावता, पाच-पाच महिने बांधकाम परवाने का देत नाहीत, असे प्रश्न उपस्थित करुन सह्या करणार नसाल तर तुमचे काय म्हणणे आहे ते लेखी द्या अशी मागणी युवकांनी करताच मुख्याधिकारी कार्यालयातून निघून गेले़ त्यानंतर संतप्त युवकांनी त्यांच्या खुर्चीला हार घालीत गांधीगिरी केली. त्यानंतर युवकांनी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांची भेट घेतली़ या वेळी नगरसेवक बंडू बोरुडे, पांडुरंग सोनटक्के आदी उपस्थित होते. तुमचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले. रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी सोमवारी पालिकेत नागरिकांची मोठी गर्दी झाली़ परंतु मुख्याधिकारी निघून गेल्याने कामे घेऊन येणार्यांनाही रिकाम्या हातानेच परतावे लागले़ (तालुका प्रतिनिधी) मुख्याधिकारी पालिकेत येत नसल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्या वागण्यामुळे नागरिकांचा रोष सहन करावा लागत आहे. शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. टंचाईचे त्यांना काही घेणे देणे नाही़ -अभय आव्हाड, नगराध्यक्षमंजूर कामांना अंतिम मान्यता देण्यासाठी मुख्याधिकारी पी़ एऩ महानवार टाळाटाळ करतात, असा आरोप करीत सोमवारी संतप्त तरुणांनी मुख्याधिकार्यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी केली़