कोरोना वाढला तर अर्थव्यवस्था धोक्यात येईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:21 IST2021-01-25T04:21:40+5:302021-01-25T04:21:40+5:30
अहमदनगर : कोरोना अजून संपलेला नाही. कोरोनाचे नियम अजून लागू आहेत. मात्र, लोकांकडून नियमांचे पालन होत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव ...

कोरोना वाढला तर अर्थव्यवस्था धोक्यात येईल
अहमदनगर : कोरोना अजून संपलेला नाही. कोरोनाचे नियम अजून लागू आहेत. मात्र, लोकांकडून नियमांचे पालन होत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर देशाची अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके आदी उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले, दो गज दुरी, मास्क है जरूरी अशी जागृती केली जाते, मात्र कार्यक्रमात तर सर्वजण खांद्याला खांदे लावून बसलेले आहेत. अनेकांच्या तोंडाला मास्कही नाहीत. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे नगर जिल्ह्यातील प्रमाण हे देशातील प्रमाणापेक्षा चांगले असून ते ९७ टक्के इतके आहे. ही गोष्ट चांगली असली तरी कोरोना अजून संपलेला नाही, हे लोकांनी ध्यानी घेतले पाहिजे. युरोपमध्येही परिस्थिती गंभीर आहे. इंग्लंडमध्ये ३५ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. पाश्चात्यांपेक्षा भारतीयांची इम्युनिटी चांगली असल्याचे सांगितले जात असले तरी लोकांनी नियमांकडे दुर्लक्ष करू नये. देशातील उपचार सुविधांना मर्यादा आहेत,याचे भानही लोकांनी ठेवले पाहिजे.
---
वैद्यकीय क्षेत्रात एकी, राजकारणात गटबाजी
वैद्यकीय गुणवत्ता असलेले डॉक्टर नगर शहरात अनेक वर्षे एकत्रपणे काम करीत आहेत. नगर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात अनेकांनी एकत्र राहणे शक्य नाही.
राजकारणात अखंड गटबाजी पहायला मिळते. वैद्यकीय क्षेत्रात सर्व डाॅक्टर एखादा प्रकल्प हातात घेतात आणि उत्तम काम करतात, हे एकीचे आगळेवेगळे दर्शन नगर जिल्ह्यात पहायला मिळाले. नगर जिल्ह्यातील एकूणच परिस्थिती वैद्यकीय क्षेत्राने बदलली आहे, असे पवार यांनी सांगितले. डॉक्टर आणि रुग्णांमध्ये कौटुंबिक संबंध असावेत, रुग्णांना डॉक्टरांबद्दल विश्वास वाटावा, असे काम डॉक्टरांनी केले पाहिजे, असा सल्लाही पवार यांनी दिला.
----
गरिबांकडूून पैसे मागू नका
कोरोनाकाळात शहरातील सर्वच डॉक्टरांचे योगदान चांगले होते. म्हणूनच कोरोनावर मात करू शकलो. मात्र, अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जीवनदायिनी योजना लागू केल्यानंतर रुग्णांकडून पैसे मागू नका. रुग्णांना मोफत सेवा द्या. त्यांचे आशीर्वाद हॉस्पिटलचे मजले वाढविण्यासाठी कामी येतील, अशी अपेक्षा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून व्यक्त केली.