केंद्राने बनवाबनवी केली तर आम्ही अण्णांच्या पाठीशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:34 IST2021-02-05T06:34:46+5:302021-02-05T06:34:46+5:30
पारनेर (जि. अहमदनगर) : केंद्र सरकारने बनवाबनवी केली तर अण्णांच्या पाठीमागे आम्ही ताकदीने उभे राहू, अशी माहिती शालेय शिक्षण ...

केंद्राने बनवाबनवी केली तर आम्ही अण्णांच्या पाठीशी
पारनेर (जि. अहमदनगर) : केंद्र सरकारने बनवाबनवी केली तर अण्णांच्या पाठीमागे आम्ही ताकदीने उभे राहू, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राळेगण येथे दिली.
बच्चू कडू यांनी शनिवारी (दि. ३०) राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन एक तास राज्यातील शेती प्रश्नांविषयी हजारे यांच्याशी चर्चा केली. यावेळी प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष पवार, जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, शरद जोशी, शेतकरी विचार मंचाचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार, सुरेश पठारे, दत्ता आवारी, अमोल झेंडे, अन्सार शेख आदी उपस्थित होते.
मंत्री कडू म्हणाले, मंत्री झाल्यावर अण्णांची भेट झाली नव्हती. अण्णांना भेटल्यावर ऊर्जा मिळते. अधिक चांगले काम करता येते. राज्यातील शेती प्रश्नांवर अण्णांबरोबर मी चर्चा केली. राज्य, जिल्हा बदलला की शेतीचे प्रश्न बदलतात. पालकमंत्री असलेल्या अकोला जिल्ह्यातील खिनखिनी गावात रोहयो योजनेंतर्गत पेरणी ते काढणीपर्यंतचा शेतीचा उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमाल दीडपट हमीभाव देण्याचा एक वेगळा प्रयोग राबविण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी अण्णांचे मार्गदर्शन घेतले.
हजारे म्हणाले, समाजासाठी चांगले काम करणारी जी काही माणसे आहेत, त्यात बच्चू कडू आहेत. निवडणुकीत मी कोणाचा प्रचार करीत नाही. मात्र, बच्चू कडू यांचे काम चांगले असल्याने त्यांच्या प्रचारासाठी गेलो होतो. हजारे यांच्या साध्या पत्राचीही दखल न घेणाऱ्या केंद्र सरकारने केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांना राळेगणसिद्धीत पाठविले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह इतर मागण्यांची पूर्तता होण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. थोडा विश्वास ठेवावा लागतो. चर्चेतून प्रश्न मार्गी लागतात, यावर माझा विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.