मानहानी, दबावामुळे विष घेतले
By Admin | Updated: June 11, 2014 00:17 IST2014-06-10T23:38:41+5:302014-06-11T00:17:32+5:30
अहमदनगर : नाशिक येथे जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले असताना काही गावगुंडांनी तहसील कार्यालयात येऊन उमेदवार माया जगताप, सहकारी सुरेश भोसले यांना धमक्या दिल्या.

मानहानी, दबावामुळे विष घेतले
अहमदनगर : नाशिक येथे जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले असताना काही गावगुंडांनी तहसील कार्यालयात येऊन उमेदवार माया जगताप, सहकारी सुरेश भोसले यांना धमक्या दिल्या. तसेच जातीवाचक व मानहानी होईल, असे वर्तन केले. या प्रकरणी पंधरा जणांवर कारवाई करावी, अशी मागणी पारगाव भातोडीचे माजी सरपंच संजय मारुती जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
याबाबत माया जगताप यांचे पती संजय मारुती जगताप यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माया जगताप या ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३ मधून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभागातून निवडणूक लढवित आहेत.
छाननी प्रक्रियेदरम्यान जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नाशिकला गेलो होतो. नाशिकला २.१५ वाजता प्रमाणपत्र मिळाले. ते इमेलद्वारे पाठवित असून ते प्रमाणपत्र मेलमधून काढून सादर करण्याबाबत सुरेश अप्पासाहेब भोसले यांना सांगितले. त्यावेळी पत्नीने मोबाईलवर झालेला प्रकार सांगितला.
तहसील कार्यालयामध्ये अमोल भाऊसाहेब जाधव, दत्तात्रय तनपुरे, अशोक शिंदे, ईश्वर विठ्ठल शिंदे, विशाल हिरामन शिंदे, महेश ज्ञानेश्वर शिंदे, सचिन संभाजी शिंदे यांच्यासह सात-आठ जणांनी मनाला वेदना होतील, असे शब्दप्रयोग करून, तसेच जातीवाचक शब्दप्रयोग करून अपमान केला. यामुळे विष घेण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही.
पत्नी गंभीर असल्याने याबाबत कारवाई करण्यासाठी पोलिसांकडे गेलो असता, तेथेही गुंडांनी हाकलून लावले. याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई कारण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान विष घेतलेल्या माया जगताप आणि सुरेश भोसले यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
(प्रतिनिधी)