पूरक पोषण आहार तेलाशिवाय शिजवणार कसा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST2021-06-03T04:15:57+5:302021-06-03T04:15:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील ६ महिने ते ३ ...

पूरक पोषण आहार तेलाशिवाय शिजवणार कसा?
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया-स्तनदा माता व किशोरवयीन मुली, कुपोषित बालके तसेच ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना सध्या पुरवठा करत असलेल्या पाककृतींमध्ये (पूरक पोषण आहारात) बदल करण्यात आला आहे. काही महिन्यांपासून तेल कमी करून त्याऐवजी साखर देण्यात येते आहे. त्यामुळे मिळालेला पूरक पोषण आहार तेलाशिवाय शिजवणार कसा? असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.
राज्यात कोरोनाची साथ असल्याने अंगणवाडीमधील बालकांना कोरोनाची लागण होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून राज्यातील अंगणवाडीतील ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना गरम ताज्या आहाराऐवजी घरपोच आहार व किराणा मालाचा पुरवठा करण्यात येतो आहे. मात्र, सध्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पूरक पोषण आहारातून तेलाचा पुरवठा कमी करण्यात आला आहे. त्याऐवजी साखर देण्यात येते आहे. मटकी, चना, मूग दाळ, गहू, मिरची पावडर, हळदी पावडर, मीठ, साखर असा पूरक पोषण आहार देण्यात येतो आहे. पूर्वी पूरक पोषण आहारात तेलाचा समावेश असायचा. सध्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या पूरक पोषण आहारात तेल मिळत नाही. महागाई बरोबरच तेलाचे भाव देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. मिळणारा आहार शिजवणार कसा? त्यामुळे पुन्हा तेल देणे सुरू करावे, अशी मागणी लाभार्थ्यांकडून होते आहे.
-----------
मुले खाण्याचा कंटाळा करतील, कुपोषण वाढेल
बालकांच्या कुपोषण निर्मूलनाची जबाबदारी महाराष्ट्र शासनावर आहे. शालेय पोषण आहार तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या वतीने कुपोषण निर्मूलन कार्यक्रम राबवला जातो. त्यामुळे शून्य ते सहा या वयोगटातील मुले, स्तनदा माता आणि गरोदर स्त्रियांच्या कुपोषण निर्मूलनासाठी मदत होते. या आहारात डाळ, तांदूळ, कडधान्य, तेल इत्यादी दिले जाते. आता तेलाऐवजी साखर देत असल्याचे समजले. तेल नसेल तर आहारात रुची येणार नाही. तेलातील पदार्थांमुळे मुलांना विविध चवीचे पदार्थ खाता येतात. मुलांची हाडे बळकट होतात. साखरेमुळे केवळ गोड पदार्थ बनवता येईल. रोज गोड कोणालाच आवडत नाही. मुले खाण्याचा कंटाळा करतील, कुपोषण वाढेल. साखरेचे आहारातील प्रमाण मर्यादित असावे, लहान मुलांना साखर देऊ नये, असे आहार शास्त्र सांगते. तरी मुलांचे आरोग्य आणि कुपोषण निर्मूलनासाठी पूर्वीप्रमाणे योग्य तेल द्यावे.
ॲड. निशा शिवूरकर, प्रदेशाध्यक्षा, अंगणवाडी कर्मचारी सभा, महाराष्ट्र राज्य
--------
अंगणवाडीतील लाभार्थ्यांसाठी प्रतिदिन प्रती लाभार्थी जे अनुदान निश्चित केले आहे. सर्वसाधारण त्या अनुदानामध्ये ५०० ते ५५० उष्मांक आणि २० ते २२ ग्रॅम प्रथिने मिळणे गरजेचे आहे. त्यानुसार अनुदानाला अधिन राहून काेणत्या घटक पदार्थांचा समावेश आहारात करायचा हे सर्वस्वी शासनाच्या निर्णयावर आधारित आहे.
वैशाली कुकडे, बालविकास प्रकल्प अधिकारी, घारगाव १, ता. संगमनेर
---------
एकात्मिक बालविकास सेवा योजना लाभार्थी (संगमनेर तालुका)
अ. नं. संगमनेर घारगाव १ घारगाव २
गरोदर ८३५ १३२३ १०१६
स्तनदा माता ८१७ १२६२ १०२८
६ महिने ते ३ वर्ष बालके ४०२८ ५९५७ ६०४४
३ ते ६ वर्ष ५१४५ ५९४४ ६१६२
-------
एकूण १०८२५ १४४८६ १४२५०
-----------
असा आहे पूरक पोषण आहार
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील लाभार्थी, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता, ६ महिने ते ६ वर्ष वयोगटातील लाभार्थी, ३ ते ६ वर्ष वयोगटातील लाभार्थी यांना चना, मटकी, मूग दाळ, मसूर डाळ, गहू, मिरची पावडर, हळद पावडर, मीठ, साखर असा पूरक पोषण आहार सध्या देण्यात येतो आहे.
...........771.............