दमदार पावसाने खरिपातील पिकांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST2021-07-15T04:16:33+5:302021-07-15T04:16:33+5:30
निंबळक : नगर तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे खऱ्या अर्थाने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. मागील आठवड्यात चांगला पाऊस झाला. ...

दमदार पावसाने खरिपातील पिकांना जीवदान
निंबळक : नगर तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे खऱ्या अर्थाने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. मागील आठवड्यात चांगला पाऊस झाला. त्याचा लाभ पिकांना होणार आहे. त्यामुळे खरिपातील पिके चांगली येणार आहेत. नगर तालुक्यात अपेक्षित क्षेत्राच्या ८५ टक्के पेरणी झाली आहे. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. मात्र, पावसाने उसंत घेऊन मागील ३-४ दिवसांत तो पुन्हा परतल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खरीप पेरणीला त्यामुळे जीवनदान मिळाले आहे, असे प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी केले.
कृषी विभागाच्या वतीने नगर तालुक्यातील टाकळी काझी येथील मूग पिकाची गहिनीनाथ कापसे, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, तंत्र अधिकारी रवींद्र माळी, नारायण करांडे यांनी पाहणी केली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शेतकरी उपस्थित होते.
कापसे म्हणाले, सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने सोयाबीन, बाजरी, मूग, तूर, कापूस अशा खरिपातील पिकांची पेरणी झाली. मात्र पेरणीनंतर पाऊस लांबल्याने चिंता होती. आता पाऊस आल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. पूर्वीच्या तुलनेत मागील २ वर्षांपासून मान्सूनपूर्व व मान्सूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने खरीप पेरणीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबवून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावून शेती उत्पादनात वाढ होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे कापसे यांनी सांगितले.
नवले म्हणाले, तालुक्यात खरिपाची ८५ टक्के पेरणी झाली आहे. आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाअभावी ज्यांची पेरणी राहिली असेल, त्यांना आता सोयाबीन व तूूर पेरणीची संधी आहे.