साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीमुळे डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST2021-07-22T04:14:25+5:302021-07-22T04:14:25+5:30
श्रीरामपूर : जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी नुकत्याच संपलेल्या गाळप हंगामात चार कोटी ३३ लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन केले. लॉकडाऊनमुळे ...

साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीमुळे डोकेदुखी
श्रीरामपूर : जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी नुकत्याच संपलेल्या गाळप हंगामात चार कोटी ३३ लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन केले. लॉकडाऊनमुळे पेट्रोलची मागणी घटल्याचे कारण पुढे करून तेल कंपन्यांनी इथेनॉल वेळेवर व पूर्ण क्षमतेने उचलले नाही.
केंद्र सरकारने २०२२ पर्यंत पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचा निर्णय घेतला होता. कारखान्यांना इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी बी ग्रेडच्या उत्पादनाला ५४ रुपये लिटर, तर सी ग्रेडला ४४ रुपये दर जाहीर करण्यात आला होता. साखर कारखान्यांमध्ये अतिरिक्त साखरेचा साठा पडून होता. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवरा, अशोक, सहकार महर्षी कोल्हे, गंगामाई, अंबालिका या साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवरच भर दिला. नुकत्याच संपलेल्या गाळप हंगामामध्ये या कारखान्यांनी चार कोटी ३३ लाख लिटर इथेनॉल निर्मिती केली.
---------
लॉकडाऊनचा फटका
पेट्रोलियम कंपन्या साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादनाचे उद्दिष्ट ठरवून देतात. त्याच्या ९५ टक्के पुरवठा करणे कारखान्यांना बंधनकारक असते. अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने यंदा पेट्रोलचा खप कमी झाला. पर्यायाने पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी इथेनॉलची मागणी घटली.
---------
५० टक्क्यांहून कमी उठाव
तेल कंपन्यांनी जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांकडील ५० टक्केपेक्षा कमी इथेनॉल आजअखेर खरेदी केले आहे. त्यामुळे साखरेऐवजी इथेनॉलकडे वळूनही कारखान्यांना लाभ झालेला नाही.
----------
इथेनॉलचे उत्पादन
अंबालिका : १ कोटी ५४ लाख
महर्षी कोल्हे : ५९ लाख
प्रवरा : ११ लाख
अशोक : २३ लाख
गंगामाई : १ कोटी ८३ लाख
---------
इथेनॉलची घटलेली मागणी हा कोविडचा परिणाम आहे. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत कारखान्यांकडील इथेनॉलची विक्री होईल असे चित्र आहे.
बलवंत पाटील, अंबालिका साखर कारखाना.
----------