भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाल्यास संस्थेत पाय ठेवणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST2021-07-23T04:14:37+5:302021-07-23T04:14:37+5:30
काष्टी : स्व. शिवरामअण्णा पाचपुते व आमदार बबनराव पाचपुते यांचे नाव मोठे करण्यासाठी पोटाला चिमटा घेऊन कारभार करीत ...

भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाल्यास संस्थेत पाय ठेवणार नाही
काष्टी : स्व. शिवरामअण्णा पाचपुते व आमदार बबनराव पाचपुते यांचे नाव मोठे करण्यासाठी पोटाला चिमटा घेऊन कारभार करीत आहोत. त्यामुळे ९७ टक्के गुण मिळवून सहकार महर्षी काष्टी सहकारी सोसायटीला सहकार महर्षी भूषण, नॅशनल फेडरेशनचे पुरस्कार मिळाले आहेत. मात्र आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय बळ वापरून संस्थेला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले गेले आहे. संस्थेत भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध केले तर पुन्हा संस्थेत पाय ठेवणार नाही, असे प्रत्युत्तर सहकार महर्षी काष्टी सोसायटीचे सर्वेसर्वा भगवानराव पाचपुते यांनी विरोधकांना दिले.
काष्टी येथे गुरुवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मागील आठवड्यात विरोधी गटाने पत्रकार परिषद घेऊन भगवानराव पाचपुते यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांच्या टीकेला उत्तर देताना पाचपुते म्हणाले, महाराष्ट्र सहकारी संस्था कलम १४४ नोटीसबाबत सहायक निबंधक सहकारी संस्था श्रीगोंदा यांनी कलम ८३च्या चौकशीनंतर संस्थेच्या संचालक मंडळास कलम १४६ची नोटीस बजावलेली आहे. त्यांना सविस्तर खुलासा वेळेत सादर केला जाईल.
राजकीय दबाव आणून नोटीस काढून संस्थेची बदनामी करणे सुरू आहे. संस्थेमध्ये कसा भ्रष्टाचार झाला. संस्थेमध्ये फार अडचणी आहेत, असे सांगितले जाते. हे चुकीचे आहे. २०२०-२१ मध्ये संस्थेला एकूण ३७ लाखांचा नफा झाला आहे. जिल्ह्यामध्ये सहकारात अनेक संस्था काम करत आहेत. दिग्गज नेतेमंडळींना सहकार महर्षीभूषण हे पुरस्कार मिळविता आले नाहीत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विठोबा पाचपुते, माजी उपाध्यक्ष भैरवनाथ कोकाटे, संचालक अधिकराव चव्हाण, लक्ष्मीकांत पाचपुते, विठ्ठलराव पाचपुते, संदीप पाचपुते, नानासाहेब पाचपुते, नवनाथ पाचपुते, सचिव गणेश पाचपुते आदी उपस्थित होते.
----
स्वत:चे घर मागे आहे का?
विठ्ठलराव काकडे हे माझ्या हाताखाली कर्मचारी म्हणून काम पाहत होते. त्यांना आपण काष्टी सोसायटीचे अध्यक्ष केले. मात्र ते आता स्वत:ला दादोजी कोंडदेव समजतात. एक पेशाने प्राध्यापक आहेत. स्वत: एका मताने निवडणूक जिंकतात. पॅनलचे मात्र डिपॉझिटही राहत नाही. त्यांनी अगोदर स्वत:चे घर आपल्या मागे आहे का? याबाबत आत्मचिंतन करावेे, असा टोला भगवानराव पाचपुते यांनी विरोधकांना लगावला.