विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी चौघांना सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:38 IST2021-02-05T06:38:59+5:302021-02-05T06:38:59+5:30
अहमदनगर : मूल होत नसल्याने सासरी विवाहितेचा छळ करून तिच्याकडे पैशाची मागणी केल्याप्रकरणी मयत विवाहितेच्या पतीसह चौघांना जिल्हा न्यायालयाने ...

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी चौघांना सक्तमजुरी
अहमदनगर : मूल होत नसल्याने सासरी विवाहितेचा छळ करून तिच्याकडे पैशाची मागणी केल्याप्रकरणी मयत विवाहितेच्या पतीसह चौघांना जिल्हा न्यायालयाने सहा महिन्याची सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायाधीश आर. एम. कुलकर्णी यांनी मंगळवारी या खटल्याचा निकाल दिला.
दीपक शंकर जाधव, शंकर जगन्नाथ जाधव, हिराबाई शंकर जाधव व लीलाबाई शंकर जाधव (रा. कणगर ता. राहुरी) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
विलास नारायण कांबळे यांची मुलगी राधिका ऊर्फ वैशाली हिचा १६ डिसेंबर २०१२ रोजी दीपक शंकर जाधव याच्याशी विवाह झाला होता. लग्नाच्या तीन वर्षांनंतर राधिका हिला मूलबाळ होत नसल्याने सासरच्या नातेवाईकांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला तसेच तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. या घटनेप्रकरणी विलास कांबळे यांनी आरोपींविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तत्कालीन सहायक निरीक्षक दिलीप राठोड यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. विष्णुदास के. भोर्डे यांनी काम पाहिले. खटल्यात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. सादर झालेले पुरावे व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली. ॲड. भोर्डे यांना पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार मोहन जोशी यांनी सहकार्य केले.