साईनगरीतील गुरुपौर्णिमा उत्सवाला आजपासून सुरुवात,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST2021-07-22T04:14:22+5:302021-07-22T04:14:22+5:30
भाविक व पालख्यांविना उत्सव साजरा करणार शिर्डी : परंपरेप्रमाणे साईनगरीत साजरा करण्यात येणाऱ्या तीनदिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला गुरुवारपासून (दि. २२) ...

साईनगरीतील गुरुपौर्णिमा उत्सवाला आजपासून सुरुवात,
भाविक व पालख्यांविना उत्सव साजरा करणार
शिर्डी : परंपरेप्रमाणे साईनगरीत साजरा करण्यात येणाऱ्या तीनदिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला गुरुवारपासून (दि. २२) सुरुवात होत आहे. यानिमित्ताने साई मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने गेल्या वर्षीच्या गुरुपौर्णिमा उत्सवाप्रमाणेच यंदाचा उत्सवही भक्तांविना साजरा करण्यात येणार आहे.
उत्सवाच्या कालावधीत कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नसून श्रींचा रथ व पालखी मिरवणूक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी दिली. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या प्रथम दिवशी गुरुवारी (दि.२२ जुलै) पहाटे साडेचार वाजता काकड आरती, पाच वाजता फोटोची व पोथीची मिरवणूक, सव्वापाच वाजता द्वारकामाई श्रीसाईसच्चरिताचे अखंड पारायण, साडेपाच वाजता मंगलस्नान, सकाळी सहा वाजता पाद्यपूजा, दुपारी साडेबारा वाजता माध्यान्ह आरती व सायंकाळी चार ते सहा यावेळेत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी सात वाजता धुपारती होईल. रात्री साडेदहा वाजता शेजारती होईल. या दिवशी श्री साईसच्चरित अखंड पारायणाकरिता द्वारकामाई मंदिर आतील बाजूने रात्रभर खुले ठेवण्यात येईल.
उत्सवाच्या मुख्य दिवशी शुक्रवारी (दि.२३) सकाळी काकड आरतीनंतर पाच वाजता अखंड पारायण समाप्ती व फोटोची व पोथीची मिरवणूक, सव्वापाच वाजता मंगलस्नान, सकाळी सहा वाजता पाद्यपूजा, दुपारी साडेबारा वाजता माध्यान्ह आरती व सायंकाळी चार ते सहा या वेळेत कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी सात वाजता श्रींची धुपारती होईल.
.....................
शुक्रवारी गोपालकाला कीर्तन
सांगतादिनी शनिवारी (दि. २४) रोजी सकाळी साडेसहा वाजता श्रींची पाद्यपूजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार असून सकाळी दहा वाजता गोपालकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर उत्सवाची सांगता होईल. दरम्यान, गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी शिर्डी येथे येऊ नये व पालख्या आणू नयेत, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.