साईसमाधी शताब्दी कृती आराखड्याला हिरवा कंदील
By Admin | Updated: June 17, 2014 00:36 IST2014-06-16T23:52:38+5:302014-06-17T00:36:24+5:30
शिर्डी : साईबाबा समाधी शताब्दीच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते, पाणी, आरोग्य, वाहनतळे आदी पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने या संदर्भातील कृती आराखड्याला मान्यता
साईसमाधी शताब्दी कृती आराखड्याला हिरवा कंदील
शिर्डी : साईबाबा समाधी शताब्दीच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते, पाणी, आरोग्य, वाहनतळे आदी पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने या संदर्भातील कृती आराखड्याला मान्यता देऊन संस्थान व्यवस्थापनाने यादृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे़
या आठवड्यात संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष शशिकांत कुलकर्णी, या समितीचे सदस्य व जिल्हाधिकारी अनिल कवडे, संस्थानचे कार्यकारी अधिकारी कुंदन सोनवणे यांनी या संदर्भातील निर्णयांवर शिक्कामोर्तब केले़ यावेळी उपकार्यकारी अप्पासाहेब शिंदे व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते़ समाधी शताब्दी महोत्सव जवळ येत असल्याने या निर्णयाची प्रतीक्षा होती़ व्यवस्थापनाच्या मान्यतेनंतर हा ठराव शासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येईल़ त्यानंतर मुख्यमंत्र्याकडे यासंदर्भात बैठक होऊन यासंदर्भात आराखडा व बजेट काढण्याबाबत निर्णय होईल़
याशिवाय संस्थान रूग्णालयात अनेकदा जागेअभावी गंभीर रूग्णांवर उपचार टाळले जातात़ यामुळे व्यवस्थापनाने अतिदक्षता विभागात सोळा कॉट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे़ सध्या केवळ अतिदक्षता व सर्वसामान्य अतिदक्षता विभागात केवळ बावीस कॉट आहेत़ रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ़ राव यांनी यासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता़
कामकाजातील पारदर्शकता वाढवण्यासाठी व्यवस्थापनाने टेंडर फायनल करताना वाटाघाटी करण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे़
ई-टेंडर नंतर सुचवलेल्या निकषावर व कमीत कमी रकमेचे टेंडर यापुढे पास करण्यात येणार आहे़ याशिवाय वर्ग एक ते चारच्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांच्या सेवानियमालाही व्यवस्थापनाने मान्यता दिली आहे़
या सेवानियमांना शासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर न्यायालयाच्या मान्यतेने रिक्त पदांचा आढावा घेऊन भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे़ याचबरोबर सेवाजेष्ठता याद्या तयार करण्याच्या कामालाही सुरूवात करण्यात आली आहे़ याखेरीज साई संस्थानचे इंग्लीश मीडियम, कन्याशाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक भरती करण्यासाठीही व्यवस्थापनाच्या प्रस्तावाला न्यायालयाने मान्यता दिली आहे़ त्यामुळे यंदा या शाळांना कुशल अध्यापक उपलब्ध होणार आहेत