गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधामुळे गावोगावच्या ग्रामसभा बंद होत्या. दरम्यान, १५ ऑगस्टपासून निर्बंध शिथिल होत असतानाच, आता ग्रामसभेस परवानगी मिळाल्याने, १५ ऑगस्ट रोजी गावच्या पारावर ग्रामसभा होणार हे निश्चित झाले आहे.
गत काही वर्षांपासून ग्रामसभा होत नसल्याने गाव विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित होते. आता या निमित्ताने त्या प्रश्नांवर खुली चर्चा होणार आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने प्रत्येक गटविकास अधिकाऱ्याला पत्राद्वारे ग्रामसभा घेण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामसभा घेताना कोविड १९चे नियम पालन करणे गरजेचे आहे. उपस्थित राहताना मास्क लावणे, तापमान घेणे, ग्रामसभा खुल्या जागी घेणे, तालुक्यातील परिस्थितीच्या अनुषंगाने ग्रामसभाबाबत निर्णय घेणे, कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींना ग्रामसभेस येण्यास प्रतिबंध करणे आदी नियम पाळावेत, असे आदेशात म्हटले आहे.