हळूहळू वाढतोय विद्यार्थ्यांचा पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:38 IST2021-02-05T06:38:16+5:302021-02-05T06:38:16+5:30
अहमदनगर : पाचवी ते आठवी शाळांची घंटा वाजल्यानंतर आता दुसऱ्या आठवड्यात हळूहळू विद्यार्थ्यांचा पट वाढत असून,सोमवारी ४४ टक्के विद्यार्थ्यांनी ...

हळूहळू वाढतोय विद्यार्थ्यांचा पट
अहमदनगर : पाचवी ते आठवी शाळांची घंटा वाजल्यानंतर आता दुसऱ्या आठवड्यात हळूहळू विद्यार्थ्यांचा पट वाढत असून,सोमवारी ४४ टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. दरम्यान सहा हजार शिक्षकांची कोरोना चाचणी झाली असून, त्यात केवळ २० जण पाॅझिटिव्ह आले आहेत. २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या. नगर जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंत एकूण २००३ शाळा असून, त्यात ३ लाख ५ हजार ७७३ विद्यार्थी आहेत. पहिल्या दिवशी ३० टक्के विद्यार्थी हजर होते. चार दिवसांनंतर म्हणजे सोमवारी विद्यार्थ्यांचा पट वाढला असून, सोमवारी १ लाख ३५ हजार ४९५ विद्यार्थी हजर राहिले. पाचवी ते आठवी एकूण २००३ शाळा असून, त्यातील १७९४ शाळा सुरू झाल्या आहेत. एकूण ६६१४ शिक्षकांपैकी ५९४२ शिक्षकांची कोरोना चाचणी पूर्ण झाली आहे. त्यात २० जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत पालकांकडून संमतीपत्र घेण्यात येत असून, पहिल्या दिवशी ९२ हजार पालकांनी संमतीपत्र भरून दिले होते. सोमवारपर्यंत हा आकडा १ लाख ४४ हजार ६३१ झाला.
कोरोनाची सर्व खबरदारी घेत सोशल डिस्टन्स ठेवून मुले वर्गात हजर करण्याबाबत सूचना असून, सध्या सकाळी १० ते २ या वेळेत शाळा भरत आहे. विद्यार्थी कमी येत असल्याने सोसल डिस्टन्स पाळणे शक्य होत आहे; परंतु ज्या दिवशी १०० टक्के पट असेल अशा ठिकाणी दोन सत्रात शाळा सुरू ठेवण्याच्या सूचना आहेत.
---------------
पाचवी ते आठवी एकूण विद्यार्थी - ३०५७७३
पैकी सोमवारपर्यंत हजर - १३५४९५
एकूण शाळा - २००३
पैकी सुरू - १७९४
शिक्षक चाचणी - ५९४२
पॅाझिटिव्ह - २०