श्रीगोंद्याला कुकडीचे पाणी तत्काळ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:28 IST2021-02-05T06:28:09+5:302021-02-05T06:28:09+5:30
अहमदनगर : नगर व पुणे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या कुरघोडीचे राजकारण बाजूला ठेवून श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी, विसापूर कालव्यांचे पाणी तत्काळ ...

श्रीगोंद्याला कुकडीचे पाणी तत्काळ द्या
अहमदनगर : नगर व पुणे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या कुरघोडीचे राजकारण बाजूला ठेवून श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी, विसापूर कालव्यांचे पाणी तत्काळ शेतकऱ्यांना द्या, अशी मागणी मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. शेती आणि शेतकरी अस्मानी संकटामुळे अनेकदा उद्ध्वस्त होतो आहे. त्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान होते. श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी राज्य शासनाच्या सुलतानी संकटामुळे पुन्हा एकदा उद्ध्वस्त होत आहे. येथे कुकडी, विसापूरचे पाणी शेतीसाठी सोडले जाते. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांचे ऊस कारखान्याला गेले. त्याचबरोबर ज्वारी, गहू, मका, कलिंगड, वांगी, काकडी आदी पिके शेतात आहेत. रबीचे आवर्तन नोव्हेंबरमध्येच मिळणे अपेक्षित होते. मात्र, पाणी न मिळाल्याने वरील पिके जळून जाण्याची शक्यता आहे. त्यातच महाविरतरणने वीजबिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी कात्रीत अडकला आहे. याकडे वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी भापकर यांनी पत्रात केली आहे.