छ. शरीफजींचा इतिहास नाभिकामुळे उजेडात!
By Admin | Updated: June 23, 2014 00:10 IST2014-06-22T23:38:49+5:302014-06-23T00:10:13+5:30
इतिहासाचे वर्तमान : भातोडीत छत्रपतींच्या वारसांचा आज स्नेहमेळावा
छ. शरीफजींचा इतिहास नाभिकामुळे उजेडात!
अशोक निंबाळकर, अहमदनगर
मराठेशाहीच्या इतिहासाची पायाभरणी अहमदनगरमध्ये निजामशाहीचा कारभार करीत असताना छत्रपती शहाजी आणि त्यांचे धाकटे बंधू शरीफजींनी केली. पुढे छत्रपतींची गादी चालविण्यासाठी माणकोजी, चौथे शिवाजीमहाराज शरीफजींच्या घराण्याने दिले. मात्र, शरीफजींचा पराक्रम आणि त्यांचे घराणे अंधारात राहिले. हा दुर्लक्षित इतिहास समोर आणण्यासाठी एक इतिहासप्रेमी नाभिकाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्याची पदरमोड सुरू आहे.
नगर तालुक्यातील भातोडीतील रणसंग्रामात छ. शरीफजींना वीरगती मिळाली. तेथे त्यांची समाधी आहे. कालौघात शरीफजींचे विविध ठिकाणी विखुरलेले हे वंशज उद्या (सोमवारी) मूळ पुरूषासमोर नतमस्तक होत आहेत. छत्रपतींच्या घराण्यातील हे ‘गेट टुगेदर’ घडवून आणले आहे ते किशोर कदम या नाभिकाने.शरीफजींनी निजामशहाकडून लढताना मोठा पराक्रम केला. भातोडीतील तलावही त्यांनी फोडून मोगलांची दाणादाण उडवली होती. मात्र, त्यांना या लढाईत वीरमरण आले. मात्र, या लढाईने शहाजीराजांचे निजामशहाच्या दरबारात वजन वाढले. त्यामुळे पुढे त्यांना मराठेशाहीची बीजे रोवणे त्यांना सोपे गेले. शरीफजींचे घराणे त्यांच्या मृत्युनंतर दुर्लक्षित राहिले. छत्रपतींचे चुलते शरीफजींचा पराक्रम समाजासमोर यावा यासाठी कदम यांची धडपड सुरू आहे. त्यांची वंशावळ, इतिहास शोधून देण्यासाठी नगरच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयातील अभिरक्षक मोडी तज्ज्ञ संतोष यादव यांनी मदत केली. त्यासाठी मोडीतील दस्तावेजही शोधले
शहा शरीफ दर्ग्याचा नवस
नगरच्या शहा शरीफ दर्ग्याला मालोजीराजे भोसले यांनी नवस केला. त्यानंतर त्यांना मुले झाल्याने एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी ठेवण्यात आले. शरीफजींचा इतिहास दुर्लक्षित राहिल्याने त्यांची समाधीही भग्न झाली. झाडाझुडूपात ती हरवून गेली होती. मध्यंतरी कदम यांनी जीवाशी ट्रेकर्सच्या मदतीने ती पूर्ववत केली. एवढा मोठा वारसा असूनही त्याकडे सरकारी यंत्रणा, राजकीय मंडळींचे लक्ष गेलेले नाही.मात्र शरीफजींचा दुर्लक्षित इतिहास शद्बबद्ध करण्यास यादव आणि कदम यांनी पुढाकार घेतला आहे.
शरीफजी ते चौथे शिवाजी
शरीफजींना त्रिंबकजी व व्यंकोजी ही दोन मुले होती. त्रिंबकजींचा मुलगा माणकोजी, माणकोजी यांच्यानंतर शहाजी. शहाजीला माणकोजी, संभाजी, मालोजी व स्वरूपजी अशी चार मुले. माणकोजी पुढे कोल्हापूरच्या गादीला शिवाजीराजे नावाने दत्तक गेले. या घराण्याला सावर्डे, टिटवे, सावरे ही गावे दत्तक दिल्याने काही वंशज तिथे गेले. चौथे शिवाजी हे सावर्डेकर भोसल्यांच्याच घराण्यातील होते. त्यांनाही नगरमध्ये वीरगती मिळाल्याने शरीफजींनंतर एक वर्तुळ पूर्ण झाले.