पुरातन वाड्यांच्या नगरीत उभ्या राहणार चौदा मजली इमारती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST2021-07-15T04:16:06+5:302021-07-15T04:16:06+5:30
श्रीगोंदा : ऐतिहासिक, अध्यात्मिक वारसा, पुरातन वाड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या श्रीगोंदा शहरात आता चौदा मजली इमारती उभ्या राहणार आहेत. तशी ...

पुरातन वाड्यांच्या नगरीत उभ्या राहणार चौदा मजली इमारती
श्रीगोंदा : ऐतिहासिक, अध्यात्मिक वारसा, पुरातन वाड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या श्रीगोंदा शहरात आता चौदा मजली इमारती उभ्या राहणार आहेत. तशी परवानगी आता प्रशासनाकडून मिळाली आहे.
श्रीगोंदा शहर म्हटले की पुरातन वाडे, मंदिराचे शहर असे ओळखले जायचे. अशा पुरातन वारसा लाभलेल्या शहरात काही अवलियांनी ज्ञानविश्वाच्या माध्यमातून गेल्या तीस वर्षांपासून शहराला नवी ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे. ते सुंदर बंगले, शाॅपिंग सेंटर उभे करून शहराचा लूक बदलून टाकत आहेत.
श्रीगोंदा हे महादजी शिंदे यांच्या पराक्रमाची व श्रीमंतीची साक्ष देणारे चार पुरातन वेशीचे शहर आहे. या शहरातील नागरिक आणि बाजारपेठ शेतीवर अवलंबून होती. सन १९९० पर्यंत शहर वेशींच्या बाहेर विस्तारलेले नव्हते. नगरपालिका झाली आणि नवी दिशा मिळाली. पहिले नगराध्यक्ष म्हणून स्व. प्रकाश पटवा यांना मान मिळाला. त्यानंतर येथे नवी स्थित्यंतरे दिसू लागली.
१९८५ ला मधुकर दोबोले (रा. मठपिंप्री, ता. नगर) हे गवंडी काम करण्यासाठी श्रीगोंद्यात आले आणि त्यांनी बांधकाम कन्स्ट्रक्शन्स कंपनी सुरू केली. त्यांच्या पाठोपाठ १९९० मध्ये बी. जे. काळे (बारडगाव, ता. कर्जत) या सिव्हिल इंजिनिअरने नवीन पद्धतीने इमारत बांधण्याचा श्रीगणेशा केला आणि शहरात अपार्टमेंटचे नवे विश्व सुरू केले. त्यानंतर वेशीच्या बाहेर उपनगरे आकार घेऊ लागली. सुधाकर वांढेकर (रा. पाथर्डी), सुहास औटी (पारनेर), नवनाथ दरेकर (हिरडगाव), वास्तुविशारद प्रसाद कुलकर्णी, संजयकुमार पटवा (श्रीगोंदा) या अभियंत्यांनीही बांधकाम व्यवसायात नवी संधी मानून शहराचा चेहरा मोहरा बदलविण्याचे काम सुरू ठेवले आहे.
गेल्या ३० वर्षांत मुख्य गावापेक्षा उपनगरांचा विस्तार वाढला आहे. त्यातून बांधकाम साहित्य व्यवसायाला नवी ऊर्जा मिळाली. शहरात दीड हजार बंगले, शंभर अपार्टमेंट आणि ५० शाॅपिंग सेंटर उभी राहिली आहेत. लक्ष्मीनगर, साईनगर, अवधूतनगर, पंतनगर, माळीनगर, शिवाजीनगर, हनुमाननगर ही उपनगरे आणि प्रोफेसर, शिक्षक काॅलनी, वडाळी, पारगाव, पेडगाव रस्त्याचा आढळगाव, घोडेगाव, काष्टी, स्टेशन रस्त्यावर वसाहतींचा विस्तार झाला आहे.
आमदार बबनराव पाचपुते यांनी शहरासाठी घोड नळपाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली. याशिवाय त्यांनी शहरातून जाणऱ्या १७ रस्त्यांसाठी ३३ कोटींचा निधीही मिळविला. यामध्ये माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, छाया गोरे, सुनीता खेतमाळीस, सुनीता शिंदे यांनीही योगदान दिले. माजी आमदार राहुल जगताप, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार यांनीही भूमिका बजावली.
१९९७ च्या शहर विकास आरखड्यानुसार शहराचे स्ट्रक्चर उभे राहिले. मात्र, २०१७ ला या आराखड्याची मुदत संपली आहे. लवकरच नवा आराखडा येणार आहे. शहरातून जाणाऱ्या लातूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गामुळे शहराच्या विकास व विस्ताराला नवी संजीवनी मिळणार आहे.
---
बांधकाम क्षेत्रातील इंजिनिअर, गवंडी यांचा श्रीगोंदा शहर विस्तारात मोठा वाटा आहे. नागरिकांना नगरपालिकेच्या माध्यमातून पाणी, वीज, रस्ते, भुयारी गटारी या मूलभूत सुविधा दिल्या जात आहेत. शहर ग्रीन सिटी करण्यासाठी वृक्षारोपणावर भर देणार देणार आहे.
-शुभांगी पोटे,
नगराध्यक्षा, श्रीगोंदा
-----
सात पासपोर्ट फोटो
१४बी. जे. काळे, मधुकर दोबोले, सुहास औटी, सुधाकर वांढेकर, प्रसाद कुलकर्णी, संजयकुमार पटवा, नवनाथ दरेकर