पहिली पसंती निर्णायक ठरणार
By Admin | Updated: December 24, 2015 23:37 IST2015-12-24T23:27:19+5:302015-12-24T23:37:07+5:30
अहमदनगर: विधान परिषद निवडणुकीत चार उमेदवार असले तरी सेनेचे शशिकांत गाडे व राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अरुण जगताप यांच्यातच खरी लढत रंगली आहे़

पहिली पसंती निर्णायक ठरणार
अहमदनगर: विधान परिषद निवडणुकीत चार उमेदवार असले तरी सेनेचे शशिकांत गाडे व राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अरुण जगताप यांच्यातच खरी लढत रंगली आहे़ त्यामुळे पहिल्या पसंतीची मते निर्णायक ठरण्याची शक्यता बळावली आहे़ पहिल्या फेरीत निकालाचे चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे़
काँग्रेसचे अपक्ष उमेदवार जयंत ससाणे यांनी माघार घेतली आहे़ परंतु ससाणे यांचे मतपत्रिकेत नाव कायम आहे़ याशिवाय मच्छिंद्र सुपेकर अपक्ष उमेदवार आहेत़ चारपैकी ए आणि बी, उमेदवार सक्रिय आहेत़ ए आणि बी एकमेकांचे प्रतिस्पर्धी असून, दोघांमध्येच खरी लढत सुरू असल्याचे चित्र सध्या तरी आहे़ मतदारांना पहिली पसंती देणे बंधनकारक आहे़ उर्वरित दोन, तीन, आणि चार, या क्रमांची मते ऐच्छिक आहेत़ त्यामुळे ए उमेदवाराला पहिली पसंती देणारा मतदार विरोधक बी ला दुसरी पसंती देणार नाही़ बी उमेदवाराला पहिली पसंती देणारा मतदार ए ला दुसरी पसंती देणार नाही़ कारण पहिल्या फेरीत २१६ चा कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या क्रमांकाची मते मोजली जातील़ दुसऱ्या फेरीत डी आणि सी ला मते मिळाली नाहीत, असे गृहीत धरल्यास दुसरी फेरीची मते मोजण्याची आवश्यकता राहणार नाही. दुसऱ्या क्रमांकावर दगा फटका होऊ शकतो़ त्यामुळे हा धोका कुणीही स्वीकारणार नाही़ उमेदवारांकडूनही तसाच प्रचार सुरू आहे़ पहिल्या पसंतीवरच ए आणि बी उमेदवाराने लक्ष केंद्रीत केले असल्याने दुसऱ्या फेरीची गरज पडणार नाही, असे म्हणण्यास वाव आहे़
पहिल्या पसंतीच्याच मतांची मागणी दोन्ही उमेदवार करत आहेत़ दुसऱ्या क्रमांकाचा धोका नकोच, अशी सावध भूमिका प्रचारात घेतली जात आहे़ निवडणुकीतून सी उमेदवाराने माघार घेतल्याने त्यांना मतदान होणार नाही़ पण, निष्ठावंतांकडून सी उमेदवाराला मतदान होण्याची शक्यता गृहीत धरून त्यांच्या मतांची मोजणी करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. परंतु त्याची आवश्यकता पडणार नाही, असाही एक सूर आहे़
(प्रतिनिधी)
उतरत्या क्रमाने उमेदवारांची यादी
पहिल्या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळणारा उमेदवार प्रथम क्रमांकावर असेल़ त्यापेक्षा कमी मते मिळणारा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असणार आहे़ मिळालेल्या मतानुसार उतरत्या क्रमांकाने ए, बी,सी, आणि डी उमेदवारांची क्रमवारी लावली जाईल़ ए आणि बी उमेदवारालाच मते पडली आणि इतरांना मते मिळाली नाही तर अशावेळी पहिल्या क्रमांकाची सर्वाधिक मते असणारा उमेदवार विजयी म्हणून घोषित करण्यात येईल़