रस्त्याने घेतला अखेर मोकळा श्वास
By Admin | Updated: June 25, 2016 00:38 IST2016-06-25T00:31:57+5:302016-06-25T00:38:35+5:30
पारनेर : तालुक्यातील जामगाव-सारोळा आडवाई रस्ता खासगी व्यक्तीने रस्त्यात दगड टाकून बंद केल्याने तीन दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या टँकरसह, शाळा,

रस्त्याने घेतला अखेर मोकळा श्वास
पारनेर : तालुक्यातील जामगाव-सारोळा आडवाई रस्ता खासगी व्यक्तीने रस्त्यात दगड टाकून बंद केल्याने तीन दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या टँकरसह, शाळा, दळणवळण बंद झाल्याने संतप्त सारोळा आडवाईच्या ग्रामस्थांनी शुक्रवारी पंचायत समितीत बांधकाम विभागाच्या विरोधात सुमारे पाच तास ढोल-ताशे बजाव आंदोलन केले. आंदोलनानंतर सायंकाळी बांंधकाम, महसूल, पोलीस प्रशासनाने रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
जामगावहून सारोळा आडवाईला मुख्य डांबरी रस्ता जातो. येथे आबुज वस्तीजवळ डांबरी रस्त्याच्या मध्यभागावर सुमारे तेवीस ट्रॅक्टर मुरूम व दगड टाकून मंगळवारपासून रस्ता बंद केला आहे. यामुळे मोठ्या वाहनांना हा रस्ताच बंद झाल्याने तेथून दळणवळणाच्या सुविधाही बंद झाल्या आहेत. गावात टँकरसह शाळांवरही परिणाम झाला. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी बुधवारी सारोळा आडवाई रस्त्याची पाहणी केल्यावर मुख्य व शासकीय रस्त्यावर खासगी व्यक्तीने अतिक्रमण केल्याने सारोळा आडवाईचे दळणवळण बंद झाल्याचा अहवाल दिला होता.
दरम्यान, तीन दिवसांपासून रस्ता बंद असूनही बांधकाम विभागासह प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी गुरूवारी बांधकाम विभागाचे अभियंता काकडे यांच्या दालनात आंदोलन केले. पाच तास चाललेल्या या आंदोलनामुळे पंचायत समिती कार्यालय दणाणले होते.
(तालुका प्रतिनिधी)
रस्ता शुक्रवारी सकाळी मोकळा करून देण्यात येईल, रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येईल, असे आश्वासन देणारे पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे अभियंता काकडे शुक्रवारी दुपारी ग्रामस्थ आल्यावर कार्यालयाच्या आवारातून पळून गेले. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. पारनेर बाजार समितीचे सभापती अरूण ठाणगे, सेनेचे नेते रामदास भोसले, माजी सरपंच देविदास आबुज, परशुराम फंड, डॉ. दत्तात्रय महांडुळे, मंगेश शिंदे, गणेश फंड यांच्यासह महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाल्या व त्यांनी ढोल ताशांच्या वाद्यांसह ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी अतिक्रमण हटलेच पाहिजे, ग्रामस्थांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणाही आंदोलनकर्त्यांनी दिल्या.दरम्यान, रामदास भोसले, सभापती अरूण ठाणगे, पत्रकार विजय वाघमारे यांच्यासह ग्रामस्थांनी तहसीलदार भारती सागरे यांना माहिती दिली. त्यांनीही काकडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला,मात्र त्यांनी फोनच बंद करून ठेवल्याने काकडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.