१ जूनपासून शेतकरी संपावर जाणारच
By Admin | Updated: May 21, 2017 14:24 IST2017-05-21T14:24:29+5:302017-05-21T14:24:29+5:30
कर्जमुक्तीसाठी संपाचे हत्यार उपसलेल्या शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी केले आहे़

१ जूनपासून शेतकरी संपावर जाणारच
आॅनलाईन लोकमत
अहमदनगर, दि़ २१ - कर्जमुक्तीसाठी संपाचे हत्यार उपसलेल्या शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी केले आहे़ सरकार विरोधी पक्षनेत्यांना हाताशी धरुन शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे़ मात्र, शेतकरी कर्जमुक्तीच्या मागणीवर ठाम असून, कर्जमुक्तीसाठी १ जूनपासून शेतकरी संपावर जाणारच, असा निर्धार शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट यांनी व्यक्त केला़
शेतकरी संपाबाबत घनवट यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेतली़ ते म्हणाले, संप यशस्वी करण्यासाठी रस्ते अडवणार, भाजीपाला बाजारपेठेत जाऊ देणार नाही, दूधाचे टँकर अडवणार आहे़ सरकार कर्जमुक्तीच्या किंवा शेतकरी उन्नतीच्या ठोस उपाययोजना सांगत नाही़ शेती उत्पादन वाढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येते़ पण सध्या वाढलेल्या उत्पदनालाच चांगला मिळत नाही़ त्यामुळे सध्याच्या शेतमालाला चांगला मिळण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत़ दहा वर्षे कर्जाची वसुली करु नका, दहा वर्षानंतर शेतकरी मुद्दलची परतफेड करील़ आयात-निर्यातवरील बंधने उठवावीत, मार्केट उपल्बध करुन द्यावे, तंत्रज्ञान आणि व्यापाराचे स्वातंत्र द्यावे, शेतमाल नासू नये, यासाठी सुविधा द्याव्यात, शेतमाल प्रक्रिया उद्योगावरील बंधने हटवावीत, आदी मागण्या घनवट यांनी केल्या़ यावेळी पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल चव्हाण, महिला आघाडीच्या अध्यक्षा सिमा नवरडे, नगर उत्तरचे अध्यक्ष कारभारी कणसे आदी उपस्थित होते़