पीकविम्याबाबत शेतकर्यांचे प्रबोधन करणे गरजेचे
By Admin | Updated: June 4, 2024 19:34 IST2014-05-19T23:34:06+5:302024-06-04T19:34:44+5:30
संगमनेर : दुष्काळग्रस्त संगमनेर तालुक्यात पीक विम्याबाबत जागृतीची गरज व्यक्त करून शेतकर्यांनी खरीप पिकांसाठी आधुनिक प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
पीकविम्याबाबत शेतकर्यांचे प्रबोधन करणे गरजेचे
संगमनेर : दुष्काळग्रस्त संगमनेर तालुक्यात पीक विम्याबाबत जागृतीची गरज व्यक्त करून शेतकर्यांनी खरीप पिकांसाठी आधुनिक प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. कृषी विभागाच्या वतीने जिल्हा बँकेच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सभागृहात खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठक झाली. बैठकीस आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बँक अध्यक्ष बाजीराव खेमनर, रामदास वाघ, जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने उपस्थित होते. थोरात म्हणाले, शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून सव्वाशे कोटी लोकसंख्येला अन्नधान्य पुरवून निर्यात केली जाते. आगामी काळात रासायनिक खतांचा काळाबाजार व राजकारण होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. बियाणे प्रक्रिया, कमीत कमी खताचा वापर यासाठी गावोगावी बैठकांद्वारे जनजागृती होण्याची गरज आहे. जिरायत भागात जलसंधारणाचे महत्व शेतकर्यांना पटवून दिले पाहिजे. जास्तीत जास्त शेतकर्यांनी खरीप पिकांसाठी आधुनिक प्रणालीचा वापर करून पीक विमा उतरविण्याचे आवाहन थोरात यांनी केले. तांबे यांनी ठिबक सिंचनाचे महत्व विषद करून महागाईमुळे शेतकर्यांनी स्वत: खत निर्मिती करण्याचे मत व्यक्त केले. बैठकीस प्रांताधिकारी संदीप निचित, तहसीलदार शरद घोरपडे, पद्मा थोरात, मिनाक्षी थोरात, अर्चना बालोडे, दिप्ती सांगळे, आरती दिघे, सुरेश थोरात, बाळासाहेब पवार, प्रभाकर कांदळकर आदी उपस्थित होते. उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)