शेतकऱ्यांचा तालुका कृषी कार्यालयावर मोर्चा
By | Updated: December 5, 2020 04:38 IST2020-12-05T04:38:20+5:302020-12-05T04:38:20+5:30
अहमदनगर : दोन वर्षांपासून रखडलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळावा या प्रमुख मागणीसाठी राळेगण म्हसोबा (ता. नगर) येथील ...

शेतकऱ्यांचा तालुका कृषी कार्यालयावर मोर्चा
अहमदनगर : दोन वर्षांपासून रखडलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळावा या प्रमुख मागणीसाठी राळेगण म्हसोबा (ता. नगर) येथील शेतकऱ्यांनी माजी सरपंच सुधीर भापकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी अकरा वाजता मोर्चा काढला.
आठ दिवसांत नगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही, तर कृषी कार्यालय बंद करण्याचा इशारा बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी दिला.
राळेगण येथील २५० शेतकऱ्यांचा २०१८ मधील पीक विमा मिळालेला नाही. यासाठी पाठपुरावा केला आहे. मात्र, फ्यूचर जनरल इंडिया विमा कंपनीने ही रक्कम दिलेली नाही. यामुळे कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी उपसभापती संतोष म्हस्के, रेवननाथ चोभे, बबनराव आव्हाड, भाजप तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, सुधीर भापकर, प्रवीण पिंपळे, विलास साळवे, विजय डावखरे, काशीनाथ भापकर, एकनाथ खराडे, विठ्ठल कोतकर, संतोष हराळ, अप्पा पिंपळे, अप्पा कुलांगे, नितीन पिंपळे, सुनील कुलांगे, किसन कोतकर, शिवाजी हराळ, आजिनाथ कुलांगे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
घिगे म्हणाले, नेमणूक करण्यात आलेल्या सीएससी सेंटरने शेतकऱ्यांची विम्याची मूळ कागदपत्रे देऊन फॉर्म भरताना चुका केल्या. त्यामुळे नगर तालुक्यातील शेतकरी दोन वर्षांपासून विम्यापासून वंचित आहेत. यापुढे कृषी सहायकाने फॉर्म भरून सीएससी सेंटरकडे भरून द्यावा. त्यामुळे चुका होणार नाहीत. मनोज कोकाटे यांनीही कृषी विभाग व विमा कंपनीवर टीका केली. यावेळी शेतकऱ्यांचे निवेदन तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांनी स्वीकारले.
चौकट...
कृषी सहायकाच्या बदलीची मागणी..
राळेगण येथील कृषी सहायकाबाबत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी कृषी सहायकाची बदली करण्याची मागणी केली. गावातील ठराविक लोकांनाच बियाणे व खताचे वाटप करतात. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत नाहीत. अनेकदा अरेरावी करतात, असा आरोप शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केला.
फोटो : ०४ राळेगण शेतकरी
राळेगण म्हसोबा येथील शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबतचे निवेदन तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांनी स्वीकारले.