शेतकऱ्यांची बिबट्याशी झुंज
By Admin | Updated: January 16, 2016 23:08 IST2016-01-16T23:03:06+5:302016-01-16T23:08:35+5:30
राहुरी : मल्हारवाडी येथील शेतकरी संजय जाधव यांनी चार मिनिटे बिबट्याशी झुंज देऊन त्याला पळवून लावले.

शेतकऱ्यांची बिबट्याशी झुंज
राहुरी : शेतात फिरत असताना अचानक बिबट्याने अंगावर झडप घातली़ हा प्रसंग कथन करतानाही अंगावर शहारे येतात, परंतु मल्हारवाडी येथील शेतकरी संजय जाधव यांनी चार मिनिटे बिबट्याशी झुंज देऊन त्याला पळवून लावले. यात जाधव किरकोळ जखमी झाले. नशीब बलवत्तर व थोडेसे धाडस दाखवले म्हणून बचावलो, असे सांगताना जाधव यांचा अजूनही थरकाप उडतो.
शुक्रवारी दुपारी राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी येथील शेतकरी संजय लक्ष्मण जाधव हे नेहमीप्रमाणे आपल्या डाळिंब शेतीची पाहणी करीत होते़ काही वेळेने त्यांना कडवळ शेताच्या दिशेने अचानक गुरगुरण्याचा आवाज आला. त्यामुळे ते थबकले. परंतु त्यांना सावरण्याच्या आधीच बिबट्याने जाधव यांच्या अंगावर झेप घेऊन त्यांना खाली पाडले. जमेल तेवढा प्रतिकार करण्यापलीकडे जाधव यांच्या हातात काहीच नव्हते. परंतु दुसऱ्याच क्षणी जाधव यांच्या हाताला जवळच पडलेले लोखंडी दाताळ लागले. त्याच्या आधारे त्यांनी बिबट्याचे तोंड दाबले. त्यामुळे बिबट्याने जाधव यांना काही वेळ सोडले. परंतु तो आणखी चवताळलेला होता. जाधव यांच्या दिशेने कूच करणार तोपर्यंत त्यांनी चोरात किंकाळी फोडली. त्यांच्या आवाजाने बिबट्या थोडा गांगरला. तो आवाज ऐकून जवळच्या शेतातच पाणी धरीत असलेले त्यांचे बंधू रामदास व भास्कर यांनी घटनास्थळी धाव घेतली. विलास गागरे, जगन्नाथ गाडे हे शेजारीही धावले. सर्वजण बिबट्याच्या दिशेने येत असल्याचे पाहून बिबट्याने ओढ्याच्या दिशेने पलायन केले. जखमी जाधव यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़ उपचारानंतर जाधव यांना घरी सोडण्यात आले असले तरी ते अजूनही भीतीच्या सावटाखाली आहे़ वन विभागाचे चंद्रकांत गाडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला़