पाऊस परतल्याने श्रावणी पोळ्याला उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST2021-09-06T04:25:13+5:302021-09-06T04:25:13+5:30
केडगाव : कोरोनामुळे गावात अनेक घरात दुर्घटना घडल्या. आजही कोरोनाची भीती संपलेली नाही. शेतीचे गणितही बिघडून गेले. पावसाने उशिरा ...

पाऊस परतल्याने श्रावणी पोळ्याला उत्साह
केडगाव : कोरोनामुळे गावात अनेक घरात दुर्घटना घडल्या. आजही कोरोनाची भीती संपलेली नाही. शेतीचे गणितही बिघडून गेले. पावसाने उशिरा का होईना दर्शन दिले. त्यामुळे श्रावणी पोळ्यासाठी शेत शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे.
शेतकी कितीही संकटात असला तरी चालत आलेल्या रूढी, परंपरा एकदम तोडत नाही. वर्षभर शेतात काबाडकष्ट करणाऱ्या सर्जा-राजाचं आजच्या पोळ्यानिमित्त उतराई व्हावचं लागतं. पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर साकत (ता.नगर) येथील शेतकरी मोहन विष्णू वाघमोडे यांनी दिलेली ही बोलकी प्रतिक्रिया बळीराजा आणि लाडक्या सर्जा-राजाचं अतूट नातं व्यक्त करण्यास पुरेशी आहे.
ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाचे सावट कायम आहे. त्यातच पावसाने दडी मारली. मोठ्या अवधीनंतर नगर तालुक्यात थोड्याफार प्रमाणात पावसाने हजेरी लावली. यामुळे पावसाच्या काळजीत असणारा बळीराजा काही प्रमाणात सुखावला. त्यामुळे घरातील दु:ख बाजूला सारत शेतकरी आपल्या सर्जा-राजाच्या सणासाठी सज्ज झाला आहे. सकाळपासूनच लाडक्या सर्जा-राजाला सजविण्यास सुरुवात झाली आहे. गुंडेगाव येथे बैलपोळ्याची जय्यत तयारी पहायला मिळत आहे. पाऊस न पडल्याने शेतकरी राजा सण कसा साजरा करायचा या विवंचनेत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या जिवात जीव आला आहे. आता पिके जगतील. गुंडेगाव, वाळकी, रूई, चिंचोडी पाटील, जेऊर, देहरे या व इतर गावातील बाजारपेठात बैलाचा साज खरेदीसाठी दुकानांमध्ये बळीराजाने गर्दी केली होती.
ज्यांच्या घरी बैल नाहीत ते मातीपासून बनविलेल्या बैलाची पूजा करतात. आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणे शेतकरी बैलांना सजावट करतात. दुपारी पूजा, पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. गावातून संध्याकाळी मिरवणूकही काढली जाते.
---
वर्षभर शेतात काम करणाऱ्या सर्जा-राजांना सजवत पूजन करून त्यांना पुरणपोळी खाऊ घालण्याचे महत्त्व पोळ्याला आहे. शेतकरी हा सण उत्साहाने व आनंदाने साजरा करतात. बैलांना सजवून वाजत-गाजत गावातून मिरवणूक काढली जाते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात कोरोनाचे सावट गडद होत चालले आहे. त्याचा परिणाम बैलपोळा सण साजरा करण्यावर दिसून येणार असल्याचे चित्र आहे.
-संतोष भापकर,
उपसंरपच, गुंडेगाव
----
चालू वर्षी सुरुवातीला पावसाने पाठ फिरविल्याने शेतीमधील उत्पन्न शेतकऱ्याच्या हातात आले नाही. मूग, बाजरी सोयाबीनच्या उत्पन्नात ६० ते ७० टक्के घट निर्माण झाली. शेतकरी आर्थिक संकटात असल्यामुळे बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा होईल.
-कारभारी कर्डिले,
शेतकरी, मजले चिंचोली
------
०५ नगर पोळा
गुंडेगाव येथे पोळ्यानिमित्त बैलांना सजविण्यासाठी विविध साज यांची खरेदी करताना शेतकरी.