आठवांनी दाटले हुंदके... नि:शब्द!

By Admin | Updated: June 16, 2014 00:11 IST2014-06-15T23:47:04+5:302014-06-16T00:11:44+5:30

अहमदनगर : दिवंगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सर्वपक्षीय नेत्यांनी जागवल्या आणि त्यामुळे मुंडेंच्या राजकीय जीवनाचा पट उलगडत गेला.

Euphrates Datty Hundke ... Silent! | आठवांनी दाटले हुंदके... नि:शब्द!

आठवांनी दाटले हुंदके... नि:शब्द!

अहमदनगर : दिवंगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सर्वपक्षीय नेत्यांनी जागवल्या आणि त्यामुळे मुंडेंच्या राजकीय जीवनाचा पट उलगडत गेला. या आठवांनी बहुतेकांना हुंदकादाटून आला अन् पुढे सारे नि:श्शब्द झाले...
सहकार सभागृहात मुंडे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या श्रद्धांजली सभेवर वरीलप्रमाणे सुतकी वातावरण होते. थोर, झुंजार नेता, आधारवड, दीपस्तंभ, राजकारणापलिकडचा मित्र अशा विशेषणांनी मुंडेंना श्रध्दांजली वाहिली. सर्वांनीच मुंडेंचे नगरमध्ये स्मारक उभे करून त्यांच्या आठवणी ग्रंथबद्ध करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या सभेला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ नेते मा.खा. बाळासाहेब विखे, मा.खा. यशवंतराव गडाख, खा. दिलीप गांधी, आ. अनिल राठोड, आ. शिवाजीराव कर्डिले, आ. बबनराव पाचपुते, आ. अरूण जगताप, आ. चंद्रशेखर घुले, आ. राम शिंदे, महापौर संग्राम जगताप,मा.आ. चंद्रशेखर कदम, हिवरेबाजारचे पोपटराव पवार, भानुदास मुरकुटे, राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार, काँग्रेसचे ब्रिजलाल सारडा, कुंडलिकराव जगताप, शिवाजी शेलार, कॉ. सुभाष लांडे, अजय साळवे, अशोक गायकवाड, नानासाहेब जाधव, शिवसेनेचे प्रा. गाडे आदी उपस्थित होते.
अण्णाहजारे म्हणाले की, मुंडे यांच्या जाण्याने राष्ट्राची आणि राज्याची मोठी हानी झाली आहे. त्यांना तळागाळातील प्रश्नांची जाण होती. त्यांच्याशी माझे जुने संबंध होते. जो राष्ट्रासाठी देह ठेवतो. त्याच्या आत्म्याला सद््गती मिळते, असे भग्वद््गीतेचा आधार देत सांगितले.
खा. गांधी म्हणाले की, नव्या पिढीला मुंडे यांचे काम समजावे यासाठी नगरमध्ये स्मारक उभे केले जाईल. जिल्ह्याला ते मावशी मानत होते. अनेक नेते, कार्यकर्त्यांचा त्यांच्याशी संपर्क आला. प्रत्येकांच्याच काही ना काही आठवणी आहेत. त्या ग्रंथरूपात शब्दबद्ध केल्या जातील. पाथर्डी तालुक्यात गितेवाडी येथे बांधलेल्या समाजमंदिरास मुंडे यांचे नाव दिले जाईल. मुंडे यांचे राजकारण संघर्षाचे होते. सर्व पक्षात मित्र असूनही त्यांनी कधी लक्ष्मणरेषा ओलांडली नाही.
गडाख म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांनी मोठे काम केले आहे. परंतु तीन पुस्तकापलिकडे त्यांच्या कामाची माहिती नाही. मुंडेंचेही काम मोठेच आहे. परंतु त्यांचा राजकीयप्रवास नव्या पिढीसमोर पुस्तक रूपातून आला पाहिजे. ते पुस्तक कार्यकर्त्यांना प्रेरणा देईल.
पाचपुते म्हणाले की, ते राजकीय विरोधक असले तरी माझे चांगले मित्र होते. बीडचा पालकमंत्री झाल्यावर ते मला भेटायला आले होते. राजकारणापलिकडे जाऊन मैत्री जपली.
कर्डिले म्हणाले, मी त्यांच्यामुळेच आमदार झालो. त्यांचासारखा नेता होणे नाही. महायुतीला देशात सत्ता मिळवून देण्यासाठी त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
राठोड म्हणाले की, त्यांचा कायद्याचा मोठा अभ्यास होता. आयुष्यात अनेक चढउतार पाहिले तरी ते डगमगले नाहीत. त्यांच्या जाण्याने समाजासोबतच सेना-भाजपाची हानी झाली आहे. शिवाजीराव शेलार यांच्यासह तब्बल ५१ जणांची भाषणे झाली. (प्रतिनिधी)
घडवून आणलेला अपघात
मुंडे हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होते. त्यांचा घडवून आणलेला अपघात सहनशीलतेपलिकडचा आहे. त्यांच्या जाण्याने भरून न निघणारे नुकसान झाले आहे, असा आरोप मा. खा. बाळासाहेब विखे यांनी केला. मुंडे हे मोठ्या चव्हाणांनंतर महाराष्ट्रातले मोठे नेते होते. त्यांच्यावर मी राधाकृष्णपेक्षाही जास्त प्रेम केले. त्यांनी प्रस्थापितांविरोधात उभारलेले राजकारण लोकांना आवडायचे.
टायर फुटलाय...
विखे यांचे भाषण संपल्यानंतर ते सभागृहाबाहेर पडले. त्यावेळी एका काँग्रेस कार्यकर्त्याच्या कंबरेच्या पिस्तुलातून गोळी सुटून ती छतावर लागली. त्याचा आवाज झाल्याने सभागृहातील लोक बाहेर काय झाले ते पाहायला जाऊ लागले. त्यावेळी घनश्याम शेलार यांचे भाषण सुरू होते. त्यांनी ‘काही नाही बाहेर गाडीचा टायर फुटलाय’ असे सांगून प्रसंगावधान राखले. नाही तर अनर्थ ओढवला असता.

Web Title: Euphrates Datty Hundke ... Silent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.