आठ नगरपालिकांच्या निवडणुकीची चुरस वाढणार
By Admin | Updated: May 16, 2016 23:26 IST2016-05-16T23:22:01+5:302016-05-16T23:26:06+5:30
अहमदनगर : श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव आणि राहुरी नगरपालिकांच्या सदस्यसंख्येत एकची भर पडली आहे़ उर्वरित पाच नगरपालिकांची सदस्य संख्या वाढली नाही़

आठ नगरपालिकांच्या निवडणुकीची चुरस वाढणार
प्रशासनाकडून सदस्यसंख्या निश्चित: प्रभाग रचना लवकरच
अहमदनगर : श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव आणि राहुरी नगरपालिकांच्या सदस्यसंख्येत एकची भर पडली आहे़ उर्वरित पाच नगरपालिकांची सदस्य संख्या वाढली नाही़ त्यात एका प्रभागांतून दोन सदस्य निवडले जाणार आहेत, त्यामुळे आठ नगरपालिकांच्या आगामी निवडणुका चांगल्याच चुरशीच्या होण्याची चिन्हे आहेत़
जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहुरी, देवळाली प्रवरा, राहाता, पाथर्डी आणि शिर्डी नगरपंचायतीच्या निवडणुका येत्या डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहेत़ मागील सार्वत्रिक निवडणुका सन २००१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या आधारे घेण्यात आल्या होत्या़ चालू वर्षी त्या २०११ च्या जनगणेनुसार वाढीव लोकसंख्येच्या आधारे होणार आहेत़ नव्याने जाहीर झालेल्या जनगणनेनुसार प्रशासनाने सदस्यांची संख्या निश्चित केली आहे़ प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे़ त्यानुसार श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर आणि राहुरी नगरपालिकांच्या सदस्यसंख्येत प्रत्येकी एकने वाढ झाली आहे़ उर्वरित देवळाली प्रवरा राहाता, पाथर्डी आणि शिर्डी नगरंपचायतीची सदस्यसंख्या ‘जैसे थे’ आहे़ नवीन जनगणनेनुसार सदस्यांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा होती़ मात्र, सदस्यांच्या संख्येत तर वाढ झालीच नाही़ पण, उलटपक्षी एका प्रभागातून दोन सदस्य निवडण्याचा निर्णय झाला आहे़ त्यामुळे जागा कमी आणि इच्छुक अधिक, अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, इच्छुकांना थोपविण्याचे मोठे आव्हान राजकीय पक्षांसमोर असणार आहे़
नगरपालिका निवडणुकांची पूर्वतयारी प्रशासनाने हाती घेतली आहे़ त्याचाच एक भाग म्हणून सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे़ दुसऱ्या टप्प्यात आठ नगरपालिकांच्या प्रभागांची रचना २०११ लोकसंख्येनुसार करण्यात येणार आहे़ येत्या जूनमध्ये प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू होईल़
प्रभागांची रचना करण्यासाठी भौगोलिक सलगता, सरासरी लोकसंख्या, प्रभागातील लोकसंख्या १० जास्त टक्के जास्त किंवा १० टक्के कमी यांसारख्या बाबी विचारात घेतल्या जाणार आहेत़ प्रभाग रचनेत मोठा फेरबदल होणार आहे़ त्याचा फटका प्रस्थापितांना बसणार आहे़
(प्रतिनिधी)